सातारा -सातारा-जावळी मतदारसंघासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमधील असंख्य लोक नोकरी, कामधंद्यानिमित्त मुंबई, नवी मुंबई परिसरात राहत आहेत. हे चाकरमानी गणेशोत्सवासाठी त्यांच्या मूळ गावी मोठ्या संख्येने येतात.
राज्य शासनाने कोकणातील चाकरमान्यांसाठी 14 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी दहा दिवसांचा केला आहे. त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यात येणाऱ्या गणेशभक्तांचाही क्वारंटाइनचा कालावधी दहा दिवसांचा करावा, अशी मागणी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे केली आहे.
आ. शिवेंद्रराजे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन मागणीचे निवेदन दिले. त्यावेळी जिल्हाधिकारी शेखर सिंह उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, करोनापासून बचावासाठी शासनाने घातलेले निर्बंध, नियम आणि आदेशांचे पालन करणे बंधनकारक आहे. गणेशोत्सव काही दिवसांवर आला आहे. सातारा जिल्ह्यातील असंख्य लोक नोकरी, कामधंद्यानिमित्त मुंबई, नवी मुंबईत स्थायिक आहेत. हे चाकरमानी गणेशोत्सवासाठी मूळ गावी येतात.
कोकणातील चाकरमान्यांप्रमाणेच सातारा जिल्ह्यातील चाकरमान्यांचाही क्वारंटाइनचा कालावधी 14 दिवसांवरून दहा दिवस करावा. हे चाकरमानी काही दिवसांसाठीच गावी येऊन उत्सव संपल्यावर परत जातात. त्यांना 14 दिवस क्वारंटाइन ठेवल्यास गैरसोय होणार आहे.
याचा विचार करून शासनाने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी क्वारंटाइनचा कालावधी कमी केला आहे. तशीच सवलत सातारा जिल्ह्यातील चाकरमान्यांनाही द्यावी. दरम्यान, याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्र्यांनी दिले.