मार्चमध्येही तलावात जवळपास 40 टक्के पाणीसाठा
निमसाखर -घोरपडवाडी (ता. इंदापूर) येथे एकेकाळी माळरान असलेल्या भागात अनेक संस्थांच्या माध्यमातून ओढा खोलीकरण व पाझर तलावाचे काम करण्यात आल्यामुळे घोरपडवाडी गाव पाणीदार झाले आहे. या ठिकाणच्या तलावात जवळपास 40 टक्के पाण्याचा साठा आहे. खोलीकरणामुळे या भागातील पिण्याचा प्रश्न तर मार्गी लागला आहे, परंतु शेतीला सुध्दा खरीप हंगामातील पिकांबरोबर परिसरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या फळबागांना देखील या पाण्याचा फायदा झाला आहे.
घोरपडवाडी हे दीड हजार लोकसंख्येचे गाव. घोरपडवाडी म्हटलं की घोंगडी आणि घोंगडी म्हटलं कि घोरपडवाडी हे समीकरण आलेच. या गावामध्ये पूर्वी दरवर्षी खरीप, रब्बी हे दोन हंगाम नेहमीच पाण्यावाचून वाया जात असे. पावसाळ्यामध्ये पडलेले पाणी ओढ्यावाटे वाहून जायचे आणि नंतर या भागातील ग्रामस्थ पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत करावी लागत असे.
दरम्यानच्या काळामध्ये गावालगत असलेल्या ओढ्यांमध्ये ऍग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती, घोरपडवाडी ग्रामपंचायत, जैन संघटना, जलयुक्त शिवार योजना यांसह अन्य संस्थांच्या माध्यमातून या भागात ओढा खोलीकरण कामे होऊन ओढ्यावर ठिकठिकाणी पाझर तलाव (सिमेंट सांडव्याची)कामे झाली. संस्था व ग्रामस्थांच्या माध्यमातून घोरपडवाडी हद्दीमध्ये सात पाझर तळ्याचे काम पूर्ण झाले.
सध्या या सात तलावांमध्ये बऱ्यापैकी पाणीसाठा टिकून आहे. सध्या या परिसरात ओढ्याच्या या पाण्यामुळे भूजल पातळीमध्ये चांगलीच वाढ झाली असून शेत विहिरी, सार्वजनिक विहिरी, बोअरवेल, हातपंप यांना चांगले पाणी आहे. त्यामुळे खरीप हंगामातील ज्वारी, गहू, बाजरी, मका, ऊस या पिकांसह डाळिंब, पेरू, शेवगा यांसह अन्य फळबागा ही या भागातील शेतकऱ्यांनी घेतल्या आहेत.
म्हणूनच मिळाली टॅंकरमुक्ती-
घोरपडवाडी गावाला कायमच टॅंकरने पाणीपुरवठा करावा लागत होता. मात्र सध्या गावालगतच्या ओढ्यावर पाझर तलावाच्या कामांमुळे टॅंकरची आवश्यकता भासत नसल्याचे चित्र मार्चच्या सुरुवातीलाच मुबलक साठा शिल्लक असल्यावरून स्पष्ट होत आहे. या भागात इतर संस्था, ग्रामपंचायत या भागातील तरुण ग्रामस्थ महिला विविध संस्थांचे अधिकारी या बरोबरच परगावी राहणारे या गावचे सुपुत्र या सर्वांनी ओढा खोली करणासाठी सातत्याने प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करण्याचे काम केले आहे. त्यामुळे हे गाव टॅंकरमुक्त झाले आहे.
घोरपडवाडी गावात सिमेंट सांडवा असलेले पाझर तलावाचे काम 2017 ते 2019 या काळात सुमारे दोन हजार तास जेसीबीच्या माध्यमातून झाले आहे. दरम्यान घोरपडवाडी गावात 7 पाझर तलावांचे काम होत असताना निघणारा गाळ संबंधित शेतकऱ्यांनी आपल्या शेतात टाकल्याने सध्या या भागातील पिकेही जोमदार आली आहेत. या तलावांतील पाणी आणखी पंधरा दिवस पुरेल एवढा साठा शिल्लक आहे.
– अण्णासाहेब धालपे, जल अभ्यासक.