म्हसवड, खंडाळा, वाई तालुक्यातील गावांना तडाखा
कवठे/म्हसवड (प्रतिनिधी) – दुष्काळी तालुक्यातील काही गांवासह खंडाळा, वाई तालुक्यातील गावांना रविवारी अवकाळी पावसाने चांगलाच तडाखा दिला. अवेळी आलेल्या या पावसाचा रब्बी हंगामातील पिकांना फटका बसणार
असल्याने महापुरातून सावरलेला शेतकरी वर्ग आता पुन्हा धास्तावला आहे.
कवठे(प्रतिनिधी) -वाई तालुक्यातील पुणे सातारा महामार्गावारील सुरूर व वेळे या गावांमध्ये रविवारी अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्याची चांगलीच धांदल उडाली. पावसामुळे कांदा, ज्वारी, गहू, हरभरा हळद उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आंब्याचे मोहोरही पावसाने झडून गेले आहेत.
गेल्या दोन दिवसांपासून वाई तालुक्यात ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. रविवारी तालुक्यातील सुरूर वेळे या गावामध्ये दुपारच्या सुमारास अचानक पावसाची मेघगर्जनेसह संततधार सुरु झाल्याने व सोसाट्याचा वारा असल्याने हातातोंडाला आलेली ज्वारी आणि गव्हाची पिके जमीनदोस्त झाली.
पावसाने ज्वारीचे पीक हे काळे पडणार असून ते विक्रीयोग्य राहणार नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्वारी, गहू, हरभरा ही पिके काढणीच्या उंबरठ्यावर उभी असतानाच अवकाळी पावसाने घाला घातल्यामुळे शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत सापडला आहे.
म्हसवड (प्रतिनिधी) -म्हसवडसह परिसरात रविवारी अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे काही प्रमाणावर नुकसान होणार आहे, विशेष म्हणजे द्राक्ष बागायतदारांना या अवकाळी पावसाचा चांगलाच फटका बसणार आहे.
रविवारी सकाळपासूनच म्हसवडसह परिसरात ढगाळ वातावरण होते. दुपारी तीनच्या सुमारास अचानक ढगांच्या गडगडाटांसह अवकाळी पावसाला सुरूवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची मोठी धांदल उडाली, तर रब्बी हंगामातील ज्वारी, गहु, हरभरा या काढणीला आलेल्या पिंकांचे काही प्रमाणात नुकसान होणार आहे. सुमारे अर्धा ते पाऊण तास झालेल्या पावसाने द्राक्ष बागांनाही फटका बसणार आहे.