Meenakshi Shinde – दिवाळी पहाट निमित्त (Diwali Pahat) ठाण्यात (Thane) झालेल्या एका कार्यक्रमावरुन सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. सबके कातिल, गौतमी पाटील म्हणून प्रसिद्ध झालेल्या लावणी डान्सर गौतमी पाटीलने (Gautami Patil Dance) दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला ठाण्यात हजेरी लावली होती. खास दिवाळी पहाटनिमित्त हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यातच या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याने आदल्या दिवसापासून त्याची चर्चा सुरु होती. ठाण्याच्या तलावपाळीजवळील कार्यक्रमात सकाळीच लावणीच्या गाण्यावर गौतमीसह तिथं आलेली तरुणाई थिरकली. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी हा कार्यक्रम आयोजित केला होता.
मात्र आता या कार्यक्रमावरुन महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले असून, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि वाद हे सध्या एक समीकरण झालं आहे. आणि असच काहीसं आता राज्याच्या राजकारणात देखील दिसून आलं आहे.
या कार्यक्रमावरुन राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता शिवसेना शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. जितेंद्र आव्हाड म्हणाले की… “महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा दिवाळी पहाट लावणीने साजरी केली गेली. संस्कृती बदललीये….. ठाणे स्मार्ट नाही ओवर स्मार्ट झालंय” अशा शेलक्या शब्दात जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे गटावर टीका केलीये.
मात्र, आता आव्हाड यांच्या या टीकेचा मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी समाचार घेतला आहे. मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन जितेंद्र आव्हाड आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. “ऊर्फी जावेद, राखी सावंत, सनी लिओनी आणि क्रिकेट सामन्यांमध्ये नाचणाऱ्या चेअर्स गर्ल तुम्हाला चालतात. पण अंगभर कपडे घालून नाचणारी गौतमी पाटील चालत नाही, अशी टीका मीनाक्षी शिंदे यांनी केली.
गौतमी पाटील यांनी माझ्या स्टेजवरत कार्यक्रम केला. आमच्या कार्यक्रमाची गर्दी पाहून आव्हाड यांच्या पोटात दुखलं. त्यामुळे त्यांनी आमच्यावर टीका केली. त्यांनी कलाकारांचा देखील अपमान केला. मुंब्र्यात आम्ही त्यांना पळवून लावले आहे. महिला असो की पुरुष त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. हे त्याच वृत्तीने बघतात म्हणून त्यांना तसे दिसते. गौतमी पाटील ही कलाकार आहे आणि ठाणेकरांनी तिला चांगल्या दृष्टिकोणातून पाहिले आहे. तिच्यासाटी पहाटे पासूनच लोक जमले होते, असंही शिंदे यांनी सांगितलं.
सुषमा अंधारे म्हणल्या…
“आतापर्यंत दिवाळी पहाटनिमित्त आम्ही पंडीत बिस्मिल्ला साहेबांची सनई, पंडीत भीमसेन जोशी यांची भक्तीगीते किंवा पद्मजा फेणानी यांचा गोड गळा… हे सगळं ऐकत होतो. आज ठाण्यामध्ये उजाडलेली दिवाळी पहाट ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनाच काय, अवघ्या महाराष्ट्रालाही अपेक्षित नसेल” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली आहे.