मुंबई – नेहमीच संपूर्ण राज्यभर एका नावाची खूप चर्चा होताना दिसते. आणि ते नाव म्हणजे ‘गौतमी पाटील’. दुकानाचं उदघाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या (Gautami Patil) कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे मोठी पब्लिसिटी, मोठी गर्दी आणि मोठा खर्च.
कॉलेजवयीन तरुणाईपासून ते नोकरदार वर्गापर्यंतच्या प्रत्येकाला गौतमीच्या नृत्याची भुरळ पडते. कधी तिच्या नृत्य करण्याच्या शैलीमुळे गौतमीवर टीकाही केली जाते तसेच, तिचा कार्यक्रमावर बंदी घाला अशी मागणीही समाजातील काही लोकांकडून होत असते.
दरम्यान, सतत चर्चेत असणारे गौतमी पाटील हे नाव आता राष्ट्रवीचे सर्वेसर्वा शरद पवार (shard pawar) यांनी केलेल्या उल्लेखामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. शरद पवार हे आज अकोला दौऱ्यावर असून एका जाहीर कार्यक्रमात आपल्या भाषणात शरद पवारांनी गौतमी पाटीलचा उल्लेख केला. तसेच, तिच्या नृत्याबाबत भाष्य करताना शरद पवारांनी उपस्थितांना थेट प्रश्नही केला.
शरद पवार एका जाहीर सभेत बोलत असताना राज्य सरकारच्या खासगीकरणाच्या धोरणावर भूमिका मांडत होते. यावेळी त्यांनी कंत्राटी पद्धतीने सरकारकडून भरती केली जात असल्यावर टीका केली. ‘नोकऱ्यांच्या बाबतीत सध्याच्या सरकारने कंत्राटी पद्धतीने भरती करण्याची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात कंत्राटी पद्धतीने पोलीस भरती करण्याची तयारी सरकारने केली आहे. इतरही क्षेत्रांत खासगीकरण वाढायला लागलं आहे,’ असं शरद पवार म्हणाले.
दरम्यान, यावेळी शरद पवारांनी नाशिकमध्ये घडलेला एक प्रसंग सांगत असताना गौतमी पाटीलचा उल्लेख केला. ते म्हणाले, ‘नाशिकमध्ये द्राक्ष मोठ्या प्रमाणावर येतात. त्यामुळे तिकडे द्राक्षापासून दारू तयार केली जाते. नाशिकमधील एक शाळा दारू करणाऱ्या कारखान्याला सरकारने दत्तक म्हणून दिली.
गेल्या महिन्यात त्या शाळेत कारखान्याच्या मालकाने कार्यक्रम ठेवला. गौतमी पाटील नाव ऐकलंय का? गौतमी पाटील हिचं नृत्य त्या शाळेत झालं. तुम्ही बघा पोरांना काय शिकवायचं? गौतमीचा धडा द्यायचा का?’ असा संतप्त सवाल शरद पवार यांनी यावेळी विचारला.
कुणासाठी करतो? काय करतो? नव्या पिढीवर काय संस्कार करतो? कशासाठी खासगीकरण करतोय? याचं भान राज्यकर्त्यांना राहिलं नाही. भाऊराव पाटील आणि पंजाबराव देशमुखांनी शैक्षणिक संस्था निर्माण करून एक वेगळं चित्र निर्माण केलं. हा आदर्श कुठे आणि गौतमी पाटीलला नृत्यासाठी बोलवणारे आणि शाळा चालवणारे हे लोक कुठे? याचा विचार करायला पाहिजे’, असा हल्ला शरद पवार यांनी चढवला.