नवी दिल्ली – केंद्र सरकारने आज घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरचे दर पुन्हा वाढवले आहेत. त्यावर जोरदार टीका करताना कॉंग्रेस पक्षाने भाजप सरकारला खोचक टोमणाही मारला आहे.
महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी भाजपला जो खर्च आला त्याच्या वसुलीसाठी ही भाववाढ करण्यात आली आहे काय अशी विचारणा त्यांनी केली आहे. कॉंग्रेस प्रवक्त्या शमा मोहंमद यांनी म्हटले आहे की गेल्या एक वर्षाच्या काळात गॅस सिलिंडरच्या किंमती 834 रूपयांवरून 1053 रूपये इतक्या झाल्या आहेत.
देशातील महागाई आणि बेरोजगाराचा दर आधीच वाढलेला असताना ही वाढ केल्याने गरीब व मध्यमवर्ग अधिक पिचणार आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही या दरवाढीवर आपल्या ट्विटर संदेशात जोरदार आक्षेप घेताना म्हटले आहे की, भाजपच्या नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीत गरीबांच्या कल्याणाच्या बाता मारल्या गेल्या होत्या.
आणि त्यानंतर लगेच विविध धान्याची पीठे, डाळी, दही, पनीर अशा बाबींवरही 5 टक्के गब्बरसिंग टॅक्स लावला गेला.आणि आता गॅस सिलिंडरमध्ये 50 रूपयांची पुन्हा दरवाढ करून गरीब आणि मध्यमवर्गाचे कंबरडे मोडले गेले.