मुंबई – इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत पहिले तीन दिवस वर्चस्व राखलेल्या भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे संघावर टीका होत असतानाच माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही ताशेरे ओढले आहेत.
पहिले तीन दिवस आक्रमक खेळ करणारा भारतीय संघ अचानक बचावात्मक खेळू लागला. जॉनी बेअरस्टो व ज्यो रूट यांना बाद करण्यासाठी संघाकडे कोणतीही योजना नव्हती. त्यांच्या याच बचावात्मक पवित्र्यामुळे पराभव पत्करावा लागला. रूट व बेअरस्टो यांना भारतीय क्षेत्ररक्षकांनी दिलेली जीवदानेही महागात पडली, असेही शास्त्री म्हणाले.
दरम्यान, ज्यो रूट व जॉनी बेअरस्टो यांच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर यजमान इंग्लंडने भारताविरुद्धच्या पाचव्या कसोटीत 7 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह त्यांनी पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली. भारताला 15 वर्षांनंतर इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती, पण भारतीय संघाने ती गमावली.