पुणे -मानाच्या गणपतींसोबत इतर मंडळेही महत्त्वाची असून, त्यांना योग्य वागणूक पोलीस आणि प्रशासन यांनी द्यावी. राज्याचा गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केले.
आगामी गणेशोत्सव नियोजन बैठकप्रसंगी ते शिवाजीनगर पोलीस मुख्यालय येथे बोलत होते. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पोलीस आयुक्त रितेश कुमार, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्ह्यधिकारी राजेश देशमुख, मनपा आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे उपस्थित होते.
पवार म्हणाले, “गणेश मंडळ राज्यातील उत्कृष्ट मंडळ यांना बक्षीस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मंडळांनी यासाठी दि. 5 सप्टेंबरपर्यंत अर्ज करावेत. कोणाच्याही भावनांचा अनादर होता कामा नये, याची काळजी घ्यावी. तर, अनेक मंडळे दहीहंडी साजरी करतात. या खेळास साहसी खेळ म्हणून मान्यता दिली असून विमा उतरविण्यात येणार आहे.’
पालकमंत्री पाटील म्हणाले, “गणेशोत्सव बाबत मंडळांनी निर्णय घेणे अपेक्षित आहे. पार्किंग आणि मिरवणुकीबाबतचे नियोजन दोन दिवस आधी जाहीर करावे. वाहतूक सुरळीत चालण्यासाठी एक हजार वॉर्डन वाढविण्यात येत आहे. पुणे शहर हे अशांत करण्याचा प्रयत्न काही जण करत आहेत, त्यामुळे मंडळांनी खबरदारी घ्यावी.’