नवी दिल्ली – क्रिकेटपटू गौतम गंभीर राजकारणात गेल्यानंतर त्यालाही आपण काय बोलतो हे कळेनासे झाले आहे. काही दिवसांपूर्वी महेंद्रसिंग धोनीमुळेच भारताने विश्वकरंडक जिंकला अशा शब्दांत कौतुक केल्यावर आता धोनीने भारताला काय दिले, अशी विचारणा करताना आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचा दाखला दिला आहे.
सौरव गांगुलीने रचलेल्या पायावरच धोनीने यशाची इमारत बांधली, अशी बोचरी टीका गंभीरने काही दिवसांपूर्वी केली होती. आता 2011 सालचा विश्वकरंडक विजेतेपद हे सांघिक यश असल्याचेही तो म्हणत आहे. काही दिवसांपूर्वी त्याने ही स्पर्धा केवळ धोनीच्या कल्पक नेतृत्वामुळेच भारतीय संघाने जिंकली होती, असे मत त्याने व्यक्त केले होते. मात्र, दोनच दिवसांत मुरब्बी राजकारण्याप्रमाणे त्यानेही रंग बदलला आहे. धोनीने भारताला काय दिले, असा सवाल विचारणारा गंभीरच क्रिकेटप्रेमींच्या टीकेचा धनी बनला आहे.
धोनीने सेहवाग, झहीर खान, सुरेश रैना, रवींद्र जडेजा, शिखऱ धवन यांना संधी देत त्यांची कारकीर्द घडवली. 2007 सालची टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा, चॅम्पियन्स करंडक स्पर्धा आणि 2011 सालची एकदिवसीय विश्वकरंडक स्पर्धा ही धोनीची उपलब्धी आहे. तुलाही त्यानेच संघात स्थान दिले. संघातील खेळाडूंमघ्ये गटबाजी पेरणाऱ्या तुझ्यासारख्या खेळाडूंनाही त्याने मोठ्या मनाने संघात सामावून घेतले हे कसे विसरतो, अशा शब्दांत क्रिकेटप्रेमींनी गंभीरला सोशल मीडियावर सुनावले आहे.