कोलकाता: केंद्रीय नौवहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी आज कोलकाता येथून बांगलादेशातील चट्टोग्राम बंदरमार्गे आगरताला येथे जाणाऱ्या पहिल्या चाचणी मालवाहू जहाजाला, व्हर्च्युअल कार्यक्रमातून हिरवा झेंडा दाखविला.
भारत आणि बांगलादेश यांच्यात झालेल्या चट्टोग्राम आणि मोंगला या बांगलादेशातील बंदरांतून भारताच्या मालवाहू जहाजांचे वहन करण्याच्या करारानुसार, हे कार्य पार
पडले.
हा मार्ग सुरू झाल्याने दोन्ही देशांना अनेक संधींचे द्वार खुले होईल. या मार्गामुळे बांगलादेशातून ईशान्य भागात जाण्यासाठी वैकल्पिक आणि संक्षिप्त मार्ग उपलब्ध झाला आहे. चट्टोग्राम आणि मोंगली या बंदरांचा वापर हे भारताच्या मालवाहतुकीसाठीचे ऐतिहासिक पाऊल आहे, असे मांडवीय यावेळी म्हणाले. याद्वारे भारत आणि बांगलादेश यांच्यात नौवहन क्षेत्रासाठी एक नवे दालन खुले झाले आहे, असेही
मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या 2019 साली झालेल्या भेटीदरम्यान, दोन्ही देशांमध्ये उच्चस्तरीय करार झाला होता व त्यानुसार चट्टोग्राम आणि मोंगली या बांगलादेशातील बंदरांतून भारतात मालवाहतूक करण्याचा करार झाला होता, त्या मानक कार्यप्रणालीनुसार आता बांगलादेश आणि ईशान्य भारतात वाहतुकीचे जाळे मजबूत करण्यासाठी दोन्ही देशांनी केलेले प्रयत्न पूर्णत्वाला आले आहेत, हे या चाचणीमुळे अधोरेखित झाले आहे.
यामुळे भारत आणि बांगलादेश यांच्यातील प्रदीर्घ संबंधांचे बळकटीकरण होईल. यामुळे दोन्ही देशातील वाहतुकीतील अंतर आणि वेळ वाचून दोन्ही देशांना आर्थिक लाभ होईल. बांगलादेशात यामुळे रोजगाराच्या संधी, वाहतूक क्षेत्रातील गुंतवणूक, व्यवसायाच्या अधिक संधी निर्माण होऊन
महसुलात वाढ होईल. भारतीय मालाची ने-आण करण्यासाठी बांगलादेशातील जहाजे आणि ट्रक्स वापरले जातील.