लेह: चीनसोबतच्या आतापर्यंतच्या चर्चेत प्रगती झाली आहे. त्यातून विषय संपायला हवा. मात्र कुठपर्यंत होइल याची आपण ग्यारेंटी देउ शकत नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले आहे. संरक्षण मंत्र्यांनी आज प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील भागाला भेट दिली. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली.
भारतीय लष्कराचा आम्हाला अभिमान असून येथे आल्यावर आपला सन्मान झाल्यासारखे वाटते असे नमूद करून ते म्हणाले की, भारताच्या एक इंच भूमीवरही कोणी कब्जा करू शकत नाही. जगातली कोणतीही ताकद आपल्या भूमीला स्पर्शही करू शकत नाही. यावेळी जवानांना संबोधित करताना ते म्हणाले की, भारत हा जगातला एकमेव देश आहे, ज्याने जगाला शांततेची शिकवण दिली.
हे विश्व एक कुटुंब असल्याचा संदेश दिला. आम्ही कोणावरही आक्रमण केले नाही अन कोणाचा भूप्रदेशही बळकावला नाही. आम्हाला अशांतता नको, तर शांतता हवी आहे. कोणाचा स्वाभिमान आम्ही दुखावला नाही. मात्र कोणी तसा प्रयत्न आमच्याबाबतीत केला तर आम्ही ते कदापिही सहन करणार नाही व त्याला चोख प्रत्युत्तर दिले जाईल.
संघर्षात शहिद झालेल्या जवानांचा आम्हाला अभिमान असून 130 कोटी भारतीय त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहेत. नरेंद्र मोदी यांच्यासारखे निर्णय घेणारे पंतप्रधान आपल्याला मिळाले असल्याचेही यावेळी त्यांनी नमूद केले.