नवी दिल्ली – काही आठवड्यापासून बऱ्याच इलेक्ट्रिक दुचाकींना आग लागल्याच्या घटना विविध राज्यांमध्ये घडल्या आहेत. याची गंभीर दखल रस्ते वाहतूक मंत्रालयाने घेतली आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपन्यांनी सदोष वाहने विकू नयेत आणि विकली असतील तर ती ताबडतोब परत घ्यावी अशी सूचना मंत्रालयाने इलेक्ट्रिक वाहन निर्मात्या कंपन्यांना केली आहे.
आर्थिक विषयावरील एका परिसंवादात बोलताना रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की, भारतामध्ये मार्च, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये कडक ऊन असते. काही वेळा उष्णतेच्या लाटा येतात. याचा इलेक्ट्रिक वाहनांच्या बॅटरीवर परिणाम होतो याची जाणीव आपल्याला आहे. मात्र अशा परिस्थितीतही वाहनांनी पेट घेतल्यासारख्या घटना घडणे अयोग्य आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या जीविताला धोका पोहोचतो. याबाबत केंद्र सरकार कदापि तडजोड करणार नाही.
भारतातील इलेक्ट्रिक वाहन उद्योग नवीन आहे. या क्षेत्रात आणखी बरेच संशोधन आणि विकास करणे गरजेचे आहे, याची जाणीव आपल्याला आहे. मात्र अशा परिस्थितीतही ग्राहकाच्या जीविताला हाणी पोहोचेल असे कुठलीही कृती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या या कंपन्यांनी करू नये. ग्राहकाची सुरक्षितता सर्वोच्च प्राधान्य क्रमाचा हा विषय आहे. मानवी जीविताबद्दल कसलीही तडजोड करता येणार नाही. काही राज्यांमध्ये काही वाहनांनी पेट घेतल्यामुळे वाहनांचे तर नुकसान झालेच आहे. त्याचबरोबर बरेच लोक जखमी झाले आहेत तर काहींना आपला जीव गमवावा लागला आहे.
तज्ञ समितीची नियुक्ती
इलेक्ट्रिक वाहनांना आग लागल्याच्या घटनांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक तज्ञ समितीची नेमणूक केलेली आहे. या समितीच्या अहवालाच्या आधारावर पुढील कार्यवाही करण्यात येईल. जर चुकीची वाहने विकली गेली असतील तर अशा कंपन्यांना दंड आणि शिक्षा करण्यात येईल असे गेल्या आठवड्यात गडकरी यांनी सांगितले होते. त्याचबरोबर या कंपन्यांना कुठल्या मार्गदर्शक सूचना द्याव्यात यासंदर्भात संबंधित तज्ञ गट शिफारसी करणार आहे.
त्यामुळे या कंपन्यांनी ज्या वाहनाचा आग लागण्याची शक्यता आहे अशी वाहने ताबडतोब परत घ्यावी, या भूमिकेसाठी गडकरी यानी पुनरुच्चार केला. भारत सरकारने इलेक्ट्रिक वाहनांना लोकप्रिय करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. मात्र असे अपघाताचे प्रकार घडल्यानंतर त्याचा ग्राहकांच्या मानसिकतेवर नकारात्मक परिणाम होतो.