नवी दिल्ली – भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजे एलआयसीची प्राथमिक समभाग विक्री म्हणजे आयपीओ चार मे पासून सुरू होणार असून ते नऊ मेपर्यंत चालणार आहे. आयपीओमधील शेअरची किंमत 902 ते 949 रुपये राहणार आहे. यात पॉलीसी धारकासाठी 60 रुपयाची तर रिटेल गुंतवणूकदारासाठी 40 रुपयाची सूट मिळणार आहे.
या अगोदर हा आयपीओ मार्च महिन्यात येणे अपेक्षित होते. मात्र दरम्यानच्या काळामध्ये रशिया- युक्रेन युद्ध सुरु झाले. त्यामुळे आणि अमेरिकेच्या व्याजदर वाढीमुळे सध्याच्या परिस्थितीमध्ये परदेशी गुंतवणूक होणार नसल्याचे गृहीत धरून या आयपीओचा आकार कमी करण्यात येणार आहे. या अगोदर केंद्र सरकार एलआयसीचे पाच टक्के भाग भांडवल आयपीओच्या माध्यमातून उपलब्ध करणार होते. मात्र सध्याच्या परिस्थितीत फक्त देशांतर्गत गुंतवणूकदार गुंतवणूक करण्याची शक्यता असल्यामुळे पाचऐवजी फक्त साडेतीन टक्के भाग भांडवल उपलब्ध करण्यात येणार आहे.
या अगोदर यातून 60 हजार कोटी रुपये अपेक्षित धरण्यात आले होते. मात्र आता ही रक्कम कमी करून 21 हजार कोटी रुपये करण्यात येणार आहे. मात्र तरीही भारतातील आयपीओच्या इतिहासातील हा सर्वात मोठा आयपीओ ठरणार आहे. या संबंधात संचालक मंडळ लवकरच औपचारकता पूर्ण करणार असल्याचे सांगितले जाते. संचालक मंडळाच्या बैठकीत आयपीओची किंमत आणि इतर तपशील ठरविण्यात येणार आहे.
या आयपीआनंतर एलआयसीची शेअर बाजारावर नोंदणी झाल्यानंतर एलआयसीचे बाजारमूल्य साधारणपणे सहा लाख कोटी रुपयाचे होणार आहे. या अगोदरच्या सेबीच्या नियमानुसार एक लाख कोटी रुपये मूल्यापेक्षा जास्त बाजार मूल्य असलेल्या कंपनीचे आयपीएलच्या माध्यमातून किमान पाच टक्के भागभांडवल विकावे लागणार होते. मात्र सरकारने या आयपीओसाठी अपवाद करून साडेतीन टक्के भाग भांडवल उपलब्ध करण्यास परवानगी मागितली आहे.
या आयपीओमधील दहा टक्के शेअर पॉलसीधारकासाठी, पाच टक्के शेअर कर्मचाऱ्यांसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. तर पस्तीस टक्के शेअर रिटेल गुंतवणूकदारांसाठी राखून ठेवण्यात येणार आहेत. सरकारने यावर्षी निर्गुंतवणुकीतून 65 हजार कोटी रुपये उभे करण्याचे ठरविले आहे. त्यामध्ये महत्त्वाचा वाटा एलआयसीच्या आयपीओचा असणार आहे