नवी दिल्ली – कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. त्यांनी नेटाने आंदोलन सुरू ठेवले असून त्या आंदोलनाच्या आडून विरोधी पक्ष सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी विरोधी पक्षांना लक्ष्य केले आहे.
नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांच्या प्रती कटिबद्ध असून कोणत्याही मुद्द्यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाउ शकतो. राहुल गांधी यांनी कायद्यांच्या विरोधात काही शंका उपस्थित केल्या आहेत. मात्र हा काही प्रतिष्ठेचा मुद्दा नाही. राहुल गांधी यांना काही आक्षेप असेल तर त्यांनी सरकारशी चर्चा करावी. त्यांच्याकडे काही तोडगा अथवा उपाय असेल तर तोही सांगावा असे गडकरी यांनी म्हटले आहे.
इतकी वर्षे कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांना राजी करू न शकल्यामुळे कॉंग्रेस पक्ष आता गोंधळाची स्थिती निर्माण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. सरकारच्या धोरणांवर टीका करण्याचा कॉंग्रेस पक्षाला अधिकार आहे. मात्र त्यांनी देशातील सर्वसामान्य नागरिक आणि गरिबांच्या विषयावर राजकारण करू नये. शेतकऱ्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याची मोदी सरकारची इच्छा असल्याचे त्यांनी नमूद केले.
26 जानेवारी रोजी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर जे काही घडले त्याचा उल्लेख करून गडकरी म्हणाले की हे निश्चितच राजकीय कारस्थान होते. काही देशद्रोही लोक शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत. या घटनेनंतर आंदोलनाची विश्वासार्हता कमी झाली असल्याचा दावाही त्यांनी केला.
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची प्रशंसा करताना ते म्हणाले की त्यामुळे विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत. अर्थसंकल्पात देशाच्या चौफेर विकासाचा विचार करण्यात आला आहे. सरकार सगळे काही उद्योजकांना विकते आहे, या विरोधकांच्या दाव्याला फेटाळताना देशाचा विकास हा उद्योग क्षेत्राशीच निगडीत असल्याचे मतही गडकरी यांनी मांडले.