सातारा – जिल्ह्यातील पर्यटनस्थळे व “क’ वर्ग धार्मिक स्थळांच्या विकास कामांसाठी निधी उपलब्ध झाला आहे. हा निधी वेळेत खर्च करण्याबरोबर कामाचा दर्जा चांगला राहिला पाहिजे, अशा सूचना राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज अधिकाऱ्यांना केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात पालकमंत्री देसाई यांनी विविध विभागांच्या कामांचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपवनसंरक्षक महादेव मोहिते, पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाढे, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकांत माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कोयनानगर येथील पर्यटन विकासाची जी कामे मंजूर आहेत ती लवकरात लवकर सुरु करावी.
तसेच तापोळा (ता. महाबळेश्वर) येथील मंजूर कामेही तातडीने सुरु करावीत. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत प्रलंबित असणारी विविध विकास कामेही वेळेत पूर्ण करावीत. ही कामे करत असताना कामांचा दर्जाही चांगला राहिला पाहिजे, अशा सूचना श्री. देसाई यांनी केल्या. विकास कामांमध्ये काही अडचणी येत असल्यास तात्काळ सांगाव्यात, त्या अडचणी सोडविल्या जातील, असेही श्री. देसाई यांनी या बैठकीत सांगितले.
शेतकऱ्यांचे जीवनमान उंचवण्यासाठी पाटण तालुक्यातील काळोली येथे बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्राची निर्मिती करावयाची आहे. याचा प्रस्ताव तातडीने सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केली. बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्राचा शेतकऱ्यांना लाभ होण्यासाठी कृष्णा, कोयना नदीकाठी शेतकरी कोणती पिके घेतात याचा अभ्यास करावा. बहुउद्देशीय कृषी संशोधन केंद्राद्वारे विविध पिकांचे संशोधन, शेतमाल प्रक्रिया, पॅकिंग, ग्रेडिग व विक्री व्यवस्था, शेतकरी गट, महिला बचत गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध विषयावरील प्रशिक्षण, कृषी विस्तार विषयक विविध प्रशिक्षण यासह अन्य उपक्रम राबविण्यात येणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी जिल्हास्तरीय दक्षता समितीची बैठकही पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली.
सातारा शहरामधील विकास कामे गुणवत्तेसह पूर्ण करण्याच्या सूचना
सातारा नगरपालिका हद्दीतील विविध विकास कामांचा आढावा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला. सातारा नगरपालिकेकडून अंतर्गत रस्ते, भुयारी गटारे यासह अन्य विकासकामे वेळेत गुणवत्तेसह पूर्ण करावीत, अशी सूचना त्यांनी केली.