एकदा आम्ही मुंबईहून दुबईला येताना एक वृद्ध दाम्पत्य मराठी बोलत असताना आम्ही त्यांच्याशी स्वतःहून संवाद साधला. त्यांच्या एकंदरीत राहणीमानावरून ते महाराष्ट्रातल्या गावामधले रहिवासी असावे असा अंदाज बांधला. त्यांना सहज विचारले, कुठे चालला. आजोबांनी डोळ्यामध्ये पाणी आणून सांगितले, मुलगा दोन वर्षांनी लंडनवरून दुबईला येतो. नवा त्यास्नी आणि भेटायला चाललो बघा. आम्ही सोलापूरजवळील गाडेगाव येथील रहिवाशी आहोत. आजीच्या डोळ्यात सारखं पाणी येत होतं. पदर लावून आजी डोळे पुसत होत्या. मुंबई एअरपोर्टवर उपाहारगृहाच्या जवळ एका टेबलवर छोट्या पितळेच्या डब्यामध्ये भाजी चटणी आणि पांढऱ्या कपड्यात भाकरी, धपाटे असं जेवण होते. मात्र, आजी जेवत नव्हत्या. आजोबा मात्र शांतपणे जेवत असताना “गुप घुमान जेव आता पोरगा भेटत नव,’ असे बोलून ते आजींना जेवण करावयास भाग पाडत होते.
आमचे सर्व लक्ष आजींकडे होते. मी त्यांना विचारले? आजी काय झाले? आजी काहीच बोलायला तयार नव्हत्या, तेवढ्यात आजोबांनी सांगितले, तिची आषाढी एकादशीचे वारी चुकते नवं. या शब्दांनी आजीला अजूनच, वाईट वाटले, तिकडे पोरगं, हां इथं तिचा पांडुरंग हाय. तिला वारी सोडून कुठेही जायचं नाय, पण दोन वर्ष बघा पोरगा गावाला आला नाही त्यालाही लई भेटायचे हाय. आजी खूप लहान वयापासून वारी न चुकता करतात त्यांचं संपूर्ण आयुष्यवारी भोवती आहे बघा. तिला तिचा पांडुरंगही हवा आहे. पण पोरगा सनीभी भेटायचं हाय.
आजींचा पेहराव कपाळावर मोठ्या कुंकू गळ्यात काळ्या मण्यांचे कर्नाटक पद्धतीचे मंगळसूत्र. एक तुळशीची माळ. हातात घट्ट काचेच्या बांगड्या मागेपुढे एक एक सोन्याची बांगडी. पायांच्या बोटांमध्ये टपोरी मोठी जोडवे असे पारंपरिक वेशभूषेचे मध्ये तर आजोबा डोक्यावर पांढरे पागोटे झब्बा, धोतर, कपाळावर वैष्णवी कुंकू, गळ्यात तुळशीची माळ, अशी वारकरी संप्रदायाची वेशभूषा होती.
तशी त्यांना पाच मुलं व एक मुलगी, असा परिवार होता. पण हा मुलगा जरा वेगळा शिक्षणासाठी पुण्याला राहून बाहेर परदेशात गेला. तो एका जहाज कंपनीमध्ये असल्याने त्याचे सध्या वास्तव्य दुबईमध्ये होते. त्यामुळे त्याने आई-वडिलांना पासपोर्ट तिकीट व एअरपोर्टवरची सगळी सुविधा उपलब्ध करून दिली होती. प्रथमच मुंबई व एअरपोर्ट या सगळ्या गोष्टींनी आजी-आजोबांना वेगळेपणा जाणवत होता. ते खूप अवघडल्यासारखे वाटत होते. पण आम्ही नाशिकवरून आलो आहोत असे सांगितल्यावर आजीही म्हणाल्या, निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यासाठी आम्ही त्र्यंबकेश्वरला जात असतो बघा. आजी हळूहळू शांत झाल्या होत्या. त्या दोघांच्याही मुखात हरिपाठ व संतांनी लिहिलेल्या ओव्या व ज्ञानेश्वरी श्लोक अगदी तोंडपाठ होते.
आजींनी सांगितले, त्यांच्या मुलाला गावाकडचा शेंगदाण्याचा लाडू खूप आवडतो. शिळे धपाटे असं बरंच काही आपल्या मुलासाठी घेऊन चाललो आहे. स्वतःच्या शेतातील धान्य मुलाला खायला घालावे ह्या उद्देशाने काही धान्य आहे. योगायोगाने आमची पण तेच विमान असल्याने आम्ही त्यांना सांगितले. त्यामुळे त्यांना आपल्याबरोबर कोणी आहे हे खूप मोठा दिलासादायक होतं. त्यांना असं वाटलं ही सगळी देवाची करणी हाय. त्या पांडुरंगाच्या मनात सर्व काही असतं बघा. असं बोलून आजी थोड्या थोड्या आमच्याशी संवाद साधू लागल्या. तुम्ही तिकडे कुठे राहतात, तिथे आपल्यासारखी मराठी माणसं आहेत का? देऊळ आहे का? आपल्यासारखे खाण्याचे, किराणा मालाचे दुकान असे एक ना अनेक प्रश्नांची उत्तरं त्या जाणून घेत होत्या. साहजिकच परदेशात जाताना असंख्य प्रश्न आपल्याही मनात येतात, तेवढ्यात लगेच आजीनी आषाढी एकादशीला तुम्ही काय करता? खरंतर आपण उपास व काही वेळ नामस्मरण शिवाय काहीच करत नसतो. पण आजींनी, ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ सर्वत्र दुरलाभा मीराला जाणे अद्वैताचे बंधन न बांधी जे नामामृत गोडी वैष्णवा लाभली, त्रिकाळ नामस्मरण जप, हे चातुर्मासाचे नियम भजन कीर्तन प्रवचन हे चार महिने आम्ही करतो.
त्यांचा प्रश्न होता तुम्ही कधी पंढरपूरला गेला होता? पण भारतात आल्यावर एक महिन्याच्या सुट्टीमध्ये आमचे कधीच पंढरपूरला, विठोबाच्या दर्शनासाठी जाता आले नाही. प्रत्येक वेळेला गौरी गणपती करून आम्ही परत दुबई गाठत असू. फिरून फिरून आजी वारी संदर्भातच बोलत होत्या. बायाबापड्या डोक्यावर तुळशीचा देव्हारा म्हणजेच तुळशी वृंदावन. गाठोडे आपले सामान, टाळ मृदुंग झेंडे पताका ज्ञानेश्वर माऊलींचा जप. चालत असतो, बघा दोन दिवस लागतात आम्हाला जायला पंढरपूरला. पण याचा मुंबई एअरपोर्टवर गंधही नाही. तिथले वातावरण अगदीच निराळे असल्याने त्यांना वाईट वाटत होते.
मुलांनी खूप आग्रह केला म्हणून त्यास तसे मी भेटायला चालले बघा. पुढे तो परत दोन वर्षांनी, गावाकडे येईल असं तो म्हणाला. पण एवढ्या लांब आपण त्याला भेटायला जातोय. त्यांनी आपले सर्व कसं व्यवस्थित केलं याचेही त्यांना कौतुक वाटत होतं. एव्हाना त्यांना एअरपोर्ट सुविधा देणारे लोक हजर झाले. त्यांना व्हीलचेअरवर बसवले. रात्रंदिवस पायी चालत मैलोन मैल चालणारे आम्ही ही गाडी म्हणजे कुबड्या वाणी वाटतं बघा. पण आम्हाला काही माहिती नाही. कसं जायचं ते कुठं जायचं ते काय करावं हे कळेनासं झालं बघा, असं बोलून त्या खुर्चीत बसल्या. आम्ही त्यांना विमानात बसल्यावर भेटून आलो. पण त्यांनी आम्ही तुमच्या शेजारी बसतो बघा. म्हणून विमानातील सीट आमच्या शेजारी करून घेतले. आजी-आजोबांकडून खूप काहीही शिकण्यासारखे होते. पदोपदी त्यांनी आम्हाला हरिपाठाचे अभंग ऐकवले. यांनी आम्हाला विचारले, “इथे किती वर्षांपासून राहतात.’ “बरीच वर्षे झाली पण आमचं नातेवाईक कोणीही नाही पण मित्रपरिवार, बरीच मराठी माणसं हीच आमचे कुटुंब होय. त्यावर उतरल्या, ज्ञानेश्वर असोनी संसारी जीवे वेगु करी। वेदशास्त्र उभारी बहामा सदा। म्हणे व्यासाची एक खूने द्वारकेचे राणे पांडवां घरी ज्ञानोबा माऊली तुकाराम।
विमानात बसल्यावर आजोबांना थोडेसे भरून आले. आज मुलामुळे आपण विमानात प्रथम बसलो आहोत. स्वतः स्वतः स्वतः राम कृष्ण हरी पांडुरंग हरी असे बोलून गळ्यातील तिसऱ्या प्रहरात मी जप करतो असे सांगून त्यांनी पायातील चप्पल काढून न लाजता मांडी घालून श्रद्धा भावेने जप केला. थोड्यावेळाने आजीनेही त्यांच्या साडीच्या कमरेमध्ये खोचलेला बटवा सदृश्य छोटी पिशवी काढून त्यात ठेवलेली जपाची माळ व विठोबाचा फोटो काढून नमस्कार केला. मला म्हणाल्या, इथे माळ ओढली तर चालेल ना गं. आणि त्यांनीही राम कृष्ण हरी पांडुरंग हरी असा जप करून परत फोटोला नमस्कार करून माळ बटव्यात घालून कमरेला अडकवली. मी त्यांना सहज विचारले, ह्या मुलाचे लग्न झाले की नाही. त्या म्हणाल्या, नाही झालं. मी खूप मुली वारीमध्ये पसंत केल्या, पण मुलगा घराकडे आलाच नाही, दोन वर्षे करोनामुळे वारी झाली नाही आणि आपल्याला वारीला जाता आले नाही आणि आता वारी आहे पण आपल्याला जाता आले नाही. परत त्यांच्या दुःख दाटून आले.
मी त्यांना विचारले, दुसऱ्या जातीची, दुसऱ्या देशातील मुलगी तुम्हाला सून म्हणून चालेल का? त्यावर त्यांनी मला तुकाराम महाराजांचा अभंग ऐकवला, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून। दुःखासी कारण जन्म घ्यावा। पाप-पुण्य करुनी जम्मा येतो प्राणी नरदेही घेऊनी हानी केली। पुढे परत दुसऱ्या अभंगातून मला म्हणाल्या, जैसी गंगा वाहे पैसे त्याचे मन भगवंत जाणे त्याची जवळी। खरंच तुम्ही आम्हाला सांगा विठुराया कोणालाही जात, पात, धर्म असे प्रश्न न विचारता त्रिकाळ वर्ष आम्हाला दर्शन देतो, शिवाय प्रत्येक गावातून आलेल्या दिंड्या एकमेकांच्या जात पात न विचारता पाया पडतात. जप, तप, कर्म, क्रिया, नेम, धर्म। सर्वान घटी राम भाव शुद्ध। न सोडी रे भाव टाकी रे संदेहो। जात, गोत, कुळ, शीळ मात भजे का त्वरित भावना युक्त। ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले।
परराज्यात परधर्मात लग्न केले म्हणून मुलींना किंवा मुलांना वाळीत टाकणं, समाजातून बहिष्कृत करणे, एखाद्या अपराध्यासारखं त्यांना वागवून अपमानित करणे किंवा यमसदनास पाठवणे असे भयंकर कृत्य करणाऱ्यांना आजीचे हे उत्तर होतं. खूप शिक्षण घेणाऱ्या माणसाला एवढी मोठी विचारधारा नसते पण खूप मोठे तत्त्वज्ञान आजींनी मला सांगितले.
लटिका व्यवहार सर्व हा संसार। वाया येरझार हरीवीण। नाममंत्र जप कोटी जाईल पाप। अतिशय सुंदर भगवंतच त्यांचं सर्व काही आहे आणि हा संसार काही काळापुरता आहे, सर्वात देखावा खरच निरर्थक आहे हे त्यांच्या बोलण्यातून जाणवले. त्यांनी मला खेळ मांडीयेला याचा भावार्थ त्यांच्या शब्दांत सांगितला- आणि जी वारी जन्म मरणाची आहे. पुन्हा येरझार नाही लीन व्हावे पांडुरंगा ठाई. चार मुलांची लग्न झाली. एकही पोरगी माझ्या जातीची नाही. सर्व मुलांचे लग्न हे वारी मध्येच ठरले. अशाच गप्पागोष्टी करताना वेळ कसा निघून गेला हे समजले नाही. आम्ही दुबई एअरपोर्टला पोहोचलो. त्यांनी आमचे फोन नंबर घेऊन ठेवले होते. आम्हीही त्यांच्या मुलाचा नंबर घेतला. दुबई एअरपोर्टवर त्यांना बऱ्याच सोपस्कार आतून यायचं होते, आमचा रेसिडेन्सीचा परमिट असल्याने आम्ही पटकन बाहेर आलो आणि त्यांच्या मुलांना फोनवर सांगितले आजी आजोबा मागून घेत आहे.
आमची आणि त्यांच्या मुलाची भेट झाली. पुन्हा भेटू, फोन करेल, तुम्ही कुठे राहतात ही चौकशी करून आम्ही तिथून अल्लेनला आलो. दोन-तीन दिवसांनी आजींचा फोन आला. लेकाला बघून खूप आनंद झाला होता, पण त्यांना इथे करमत नाही. 2-3 दिवसांनी फोन आला होता. आषाढी एकादशीच्या आधी त्याने आम्हाला सांगितले की झूम मीटिंग तात्या म्हणजे त्याचे वडील व आईला एकादशीचं अभंग व भजन म्हणायचे आहे तर तुम्ही इच्छुक वेळेनुसार आपण भेटू. त्याप्रमाणे आम्ही आषाढीला व्हर्च्युअल आषाढीची वारीचा अनुभव अनुभवला. अत्यंत सुंदर आवाजात आजोबांनी तुकोबारायांचे, निवृत्ती महाराज, एकनाथ महाराजांचे चिरंजीव पद, ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग गायले. भावेविण भक्ती भक्ती विना मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये।, देवाचिये द्वारी उभा क्षणभरी, मुक्ती चारी साधियेल्या हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा असे अनेक भक्तिरसात आम्हीही न्हाऊन निघालो.
अल्लेन व दुबई लांब असल्याकारणाने त्यांचे आमच्याकडे येणे झाले नाही. पण जाताना आजी व आजोबांचा आम्हाला फोन आला, नकळत मलाही असे वाटले, साधु बोध झाला तो नुनिया ठेला ठायेचा मुराला अनुभव। कापुराच्या वाती उजळणी ज्योती आईच समाप्ती झाली जैसी।
असा आत्मअनुभव आम्हाला मिळाला. खूप भरभरून प्रेमाने बोलणारे पंढरपूर शिवाय दुसरे विश्व नसणारे कैवल्या बाई व रामचंद्र बुवा पुढच्या वारीला आनंदाने सामील होतील. पुन्हा वारी, तो भक्तिमय आनंद सर्वांना देत व स्वतः भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन जातील.
– ज्योत्स्ना पाथ्रीकर