नवी दिल्ली- इंधनाचे वाढणारे दर कमी करावेत, यासाठी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून विनंती केली आहे. पंतप्रधानांनी राजधर्माचे पालन करावे आणि आयात कर अल्प प्रमाणात कमी करून इंधनाचे दर कमी करावेत, असे सोनिया गांधींनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
देशाचा “जीडीपी’ अत्यल्प आहे. गॅस, डिझेल आणि पेट्रोलचे दर अनिर्बंधपणे वाढत आहेत. नागरिकांवरील ताण कमी व्हावा, यासाठी सरकारे निवडली जातात. पण प्रत्यक्ष्यात नागरिकांच्या हिताच्या विरुद्धच सरकार काम करत आहे. प्रत्येक नागरिकाच्या मनातील इंधनाच्या वाढत्या दरांबाबतची नाराजी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण हे पत्र लिहिले आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे.
एकिकडे देशातील रोजगार, वेतन आणि घरगुती उत्पन्न झपाट्याने कमी होत आहे. मध्यमवर्गीय निर्वाहासाठी संघर्ष करतो आहे. महागाई आणि घरगुती वापराच्या बहुतेक आवश्यक गोष्टींच्या वाढत्या दरांमुळे हे आव्हान अधिकच कठीण होत चालले आहे, असेही सोनिया गांधींनी पंतप्रधानांना लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे.