शिरूर (प्रतिनिधी) – शिरूर येथे पायी चालणाऱ्या परप्रांतीयांना शिरूर प्रांताधिकारी संतोष कुमार देशमुख व शिरूर तहसीलदार लैला शेख यांच्या प्रयत्नाने जवळपास एक ते दोन तासात 8 एस टी बसेस प्रत्येकी 22 प्रवासी असे एकूण 176 प्रवासी त्यात महिला आणि लहान मुले अशा परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यांच्या सीमेपर्यंत सोडवण्यासाठी शिरूर येथून एसटी बस तात्काळ सोडण्यात आल्या.
यावेळी, महाराष्ट्राच्या लाल परित बसताना परप्रांतीय म्हणाले. “बहुत दिक्कत से चलते चलते आये है, डर दहशत साथ मे थी, हमे पता नही था, ख्वाब मे नही सोचा था, यहा फरिस्ते मिलेगे. असे म्हणत पुणे, चाकण, रांजणगाव औद्योगिक वसाहत येथून पायी चालत आलेले मध्यप्रदेशातील, उत्तर प्रदेश, बिहार येथील कामगारांनी आपल्या भावना व्यक्त करत असताना शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख, महाराष्ट्र शासन यांचे आभार मानले.
दुपारच्या उन्हाची कायली आणि या भर उन्हात शेकडो परप्रांतीय नागरिक पायी आपल्या गावचे दिशेने निघाले होते. तहान, भूक, होणाऱ्या वेदना, उन्हाचे चटके सर्वकाही विसरून हे नागरिक अंतर कापत होते. तेवढ्यात शिरूर तहसीलदार कार्यालयात शासनाचा आदेश आला की पायी चालणाऱ्या परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्याच्या सीमेजवळ एसटी बसने सोडावे.
आदेश मिळता क्षणी शिरूर प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख व तहसीलदार लैला शेख हे शिरूर जवळ सतरा कमानी पुलाजवळील जिल्हा हद्दबंद केलेल्या ठिकाणी आले व पायी जाणाऱ्या परप्रांतीयांना तरुणांना त्यांनी थांबवून ठेवले. तेवढ्यात शिरुर एस टी बस स्थानकाचे महेंद्र माघाडे, शिरूर ग्रामीण रुग्णालयाची तुषार पाटील यांना त्या ठिकाणी बोलून घेऊन शासनाचा आदेश दाखवला आणि अधिकाऱ्यांनीही ही प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख यांना साथ देण्याचे ठरवले.
काही वेळात एसटी बस ,एसटी ड्रायव्हर, शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे पथक त्या ठिकाणी आले. जमलेले शंभर-सव्वाशे परप्रांतीय नागरिकांची नावे घेण्याची काम सुरू केले. तर शिरूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक तुषार पाटील यांनी टेंपरेचर मशीन ने त्यांचे टेंपरेचर चेक करणे सुरू केले. काही वेळात तेथे आलेल्या तीन-चार एसटी पैकी प्रत्येकी बसमध्ये बावीस नागरिक बसवण्यात आले.
काही वेळापूर्वी जिवाचा आटापिटा करत पायी निघालेल्या परप्रांतीय नागरिकांना स्वप्नातही वाटले नव्हते की काही क्षणात आपल्या गावापर्यंत जायला आपल्याला वाहनाची व्यवस्था होईल. यासाठी प्रांताधिकारी संतोषकुमार देशमुख, तहसीलदार लैला शेख, शिरूर बस स्थानकाचे प्रमुख महेंद्र माघाडे, शिरूर ग्रामीणचे वैद्यकीय अधीक्षक तुषार पाटील, बेलवंडीचे पोलीस निरीक्षक अरविंद माने या सर्वांनी एकमेकांना सहकार्य करत या नागरिकांना त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले.
“शासनाचा आदेश आला. आदेश वाचताच आम्ही अगोदर सतारा कामानी पुलाजवळ आलो. शिरूर बस स्थानक, शिरूर ग्रामीण रुग्णालय, शिरूर पोलीस स्टेशन येथे संपर्क करून सर्व अधिकाऱ्यांना याठिकाणी बोलवलं, अखेर महाराष्ट्राच्या लाल परिने परप्रांतीयांना आपल्या कवेत घेऊन त्यांच्यावर घरापर्यंत सोडविण्याचा ध्यास घेतला हे म्हणणे योग्य ठरेल.
काही वेळातच पायी निघालेल्या जवळपास सव्वाशे परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या घरी, गावी पाठवण्यासाठी एसटी बसची सेवा करून त्यांची तपासणी याठिकाणी करून लगेच त्यांना त्यांच्या गावी पाठवले आहे. आज रात्री किती वाजू, परंतु जेवढे लोक आज आम्हाला मिळून येतील त्या सर्वांना पाठवण्याची जबाबदारी आता माझी राहणार आहे. त्यांना त्यांच्या घराची ओढ आहे. त्यांना जर इथून गाडी मिळाली की, त्यांना त्याचे कुटुंबियांशी लवकर भेट होईल. त्याच्याकडून यापेक्षा दुसरा आशीर्वाद आम्हाला काय मिळणार. पहाटे पाच वाजले तरी चालेल पण जास्तीत जास्त परप्रांतीय नागरिकांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवणार असा दृढनिश्चय यावेळी संतोषकुमार देशमुख (प्रांत अधिकारी) यांनी बोलून दाखवला.
पुणे, चाकण, रांजणगाव येथून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार आपल्या राज्यात पायी निघाले आहेत. याबाबत शासनाने पायी चालणाऱ्या या परप्रांतीयांना एसटी बसची व्यवस्था करून त्यांच्या राज्याचे सीमेपर्यंत सोडवण्याची जबाबदारी सर्व तहसील कार्यालयाकडे दिली. या आदेशा प्रमाणे लगेच या नागरिकांना गोळा करून त्यांना विश्वास देऊन त्यांची तपासणी करून त्यांना येथून जेवणाचे पाकीट देऊन त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पाठवले, आतापर्यंत आठ बसेस संध्याकाळपर्यंत जातील. त्यानंतर जेवढ्या बसेस लागतील तेवढ्या आम्ही सोडणार आहेत. अशी माहिती शिरूर तालुका तहसीलदार लैला शेख यांनी दिली.