पुणे (प्रभात वृत्तसेवा ) – भारत गौरव मुनीश्री पुलकसागरजी महाराज यांचा सोमवारी (दि. 11) 50 वा अवतरण दिन संपूर्ण देशभर साजरा होणार आहे. 25 वर्षांपूर्वी त्यांनी दीक्षा घेतली होती आणि तेव्हापासून ते मुनीश्री पुलकसागरजी महाराज या नावाने देश-विदेशांत ओळखले जाऊ लागले. जैन मुनींची दीक्षेनंतरची कठोर जीवन शैली हा त्यांचा दैनंदिन जीवनाचा भाग आहे. एकदा सकाळी जलभोजन घेतले, की दुसऱ्या दिवशीच ते घेतले जाते. आचार्य पुलकसागरजी महाराज यांचे आज देश-विदेशात जैन व जैनेत्तर अनेक अनुयायी आहेत.
आचार्य यांनी आध्यात्मिक कार्यास जोड देत अ. भा. पुलकजन चेतना मंच एवं रा. जैन महिला जागृती मंच सारख्या 750 पेक्षा जास्त शाखा संपूर्ण देशभर समाजपयोगी (रक्तदान, पुलक प्रसादी अन्नदान कार्यक्रम, वृक्षारोपण इ.) प्रकल्प राबवत आहेत.
त्यांच्या आध्यात्मिक, सामाजिक कार्याच्या गौरवप्रती सन 2010 मध्ये “राष्ट्रसंत’ उपाधी, तर दिल्ली सरकारने 2012 मध्ये “विश्वसंत’ म्हणून गौरवले आहे. 2015 मध्ये भारत गौरव पुरस्काराने, तर ब्रिटिश पार्लमेंट ऑफ लंडनद्वारा 2018 मध्ये “शांतिदूत’सारख्या सर्वश्रेष्ठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
आचार्य पुलकसागरजी महाराज यांचा 50 वा अवतरण दिन संपूर्ण देशभर साजरा होत आहे. याचे औचित्य साधत “अप्रतिम संत’ हा कार्यक्रम व आचार्य यांच्या जीवनपटावरील अनेक गोष्टीचा उलगडा या कार्यक्रमातून होणार आहे. हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी 7:20 वाजता पारस चॅनलवर, तर 8 वाजता जीनवानी चॅनेलवर सर्वांना पाहता येणार आहे.