नगर -जिल्ह्यातील 14 व्यक्ती आज करोनामुक्त झाल्या असून, त्यांना नगर येथील बूथ हॉस्पिटल येथून डिस्चार्ज देण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 109 करोनाग्रस्त बरे होवून घरी परतले आहेत.
आज राहाता तालुक्यातील पाच, अकोले तालुक्यातील दोन, संगमनेर तालुक्यातील तीन, तर पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यांतील प्रत्येकी एक, अशा चौदा रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला.
जिल्ह्यातील करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांना यश आल्याचे
चित्र दिसत आहे.
मात्र, त्याचबरोबर करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच काल श्रीगोंदा येथील एका दहा महिन्यांच्या बाळाने करोनावर मात केली आहे. आज पुन्हा जिल्ह्यात 12 करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांनी शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून वेळोवेळी केले जात आहे. मात्र नागरिक याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे प्रशासनाने आणखी कडक पावले उचलावीत, असे ही काही नागरिकांमधून बोलले जात आहे.