नवी दिल्ली – कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सलग 42 महिने प्रथम क्रमांकावर असलेला भारतीय संघ सध्या करोनामुळे एकही सामना होऊ शकत नसतानाही कसोटी क्रिकेट क्रमवारीत आपले स्थान गमावतो व थेट तृतीय क्रमांकावर ढकलला जातो. ही असली कसली अनाकलनिय गुणपद्धती आहे, अशा शब्दात भारताचा माजी कसोटीपटू गौतम गंभीर याने आयसीसीवर टीका केली आहे.
सध्या जगभरात करोना विषाणूंचा धोका कायम असल्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा एकही सामना होत नाही. मग गेल्या तब्बल 42 महिन्यांत अग्रस्थानी असलेला भारतीय संघ खाली कसा फेकला जातो. ही स्पर्धा जर 2019-2020 या कालावधीसाठी घेण्यात येत आहे तर मग त्यात त्यापूर्वीच्या मोसमातील विजयाचे अतिरीक्त गुण ऑस्ट्रेलियाला देण्यात कसे आले. याच गुणांमुळे भारतीय संघाला प्रथम स्थान गमवावे लागले. आयसीसीने ही कोणती नवी पद्धत शोधून काढली आहे तेच समजत नाही, असेही गंभीरने सांगितले.
जागतिक स्तरावर क्रिकेटचे सामने जेव्हा होत असतात तेव्हा आयसीसी ठराविक काळानंतर क्रमवारी जाहीर करते हे आपल्याला माहीत आहे पण इथे सध्या एकही सामना झालेला नसतानाही आयसीसीने कोणत्या निकषांवर क्रमवारी जाहीर केली. जर कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे तर मग याच स्पर्धेतील यशापयशाचे मोजमाप झाले पाहिजे. मग दोन मोसमापूर्वीची कामगिरी हा कसा निकष असू शकतो, अशी विचारणाही गंभीरने केली आहे. आयसीसीने चार वर्षांपूर्वीच रॅंकिंग पद्धती बंद केली होती. मग तरीही अशाच पद्धतीने गुण कसे देण्यात आले. जर याबाबत नवा नियम केला गेला असेल तर त्याची माहिती सर्व देशांच्या क्रिकेट मंडळांना दिली गेली होती का, जर दिली गेली असेल तर आयसीसी ही गुणपद्धती व त्याची माहिती संकेतस्थळावर का टाकत नाही, असेही गंभीरने विचारले आहे.
गुणपद्धतीवर विश्वास नाही…
भारतीय संघाची कामगिरी सुमार झाली असती व त्यामुळे त्यांचे क्रमवारीतील स्थान खालावले असते तर ते मान्य केले असते. मात्र, आयसीसीच्या या अनाकलनिय नियमांवर माझा विश्वास नाही. एखाद्या संघाने घरच्या मैदानावर तसेच परदेशातील मैदानावर विजय मिळवला असेल तर समान गुण दिले जातात मग यावेळीच हा बदल का, अशी विचारणाही गंभीरने केली आहे.