मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर भाजप प्रवेशासाठी दबाव होता. त्यांनी भाजपचा प्रस्ताव नाकारल्यानंतरच त्यांच्यावर ईडीची कारवाई करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मी भाजपचा प्रस्ताव स्वीकारला असता तर महाविकास आघाडीचे सरकार दोन वर्षांपूर्वीच कोसळले असते, असे अनिल देशमुख म्हणाले आहेत. यावर भाष्य करताना आज पत्रकार परिषदेत संजय राऊत म्हणाले, अनिल देशमुख यांनी काही आमदारांसह भाजपमध्ये यावे, असा प्रस्ताव होता. त्यासाठी देशमुखांवर दबाव टाकण्यात आला. देशमुख यांनी हा प्रस्ताव नाकारल्यामुळेच त्यांना नंतर तुरुंगात टाकण्यात आले. देशमुखांवर कसा दबाव टाकला, याबाबतचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. याबतचे व्हिडिओ क्लिपही माझ्याकडे आहे. हे सर्व पुरावे अनिल देशमुखांनी स्वत: शरद पवारांनाही दाखवले होते.
देशमुखांप्रमाणेच जयंत पाटील यांच्यावरही भाजप प्रवेशासाठी दबाव टाकण्यात आला. त्यांनी तो नाकारताच त्यांच्यामागे ईडी चौकशीचा ससेमिरा लावण्यात आला. प्रत्येक विरोधी पक्षातील नेत्यावर अशा प्रकारचा दबाव टाकला जात आहे.
शिंदे गटाचे सर्व 13 खासदार पडणार
लोकसभेच्या 19 जागांवर ठाकरे गटाने दावा केला आहे. त्यावरून शिंदे गटाचे नेते व मंत्री शंभूराज देसाई यांनी ठाकरेंवर टिका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना राऊत म्हणाले, येत्या लोकसभा निवडणुकीत शिंदे गटाचे सर्वच्या सर्व 13 खासदार पडतील. त्या सर्वांचा आम्ही पराभव करू व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या जागांवर पुन्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार निवडून आणू.