छत्रपती संभाजीनगर – गेल्या दोन दिवसांपासून राज्यात चालू असलेल्या अपघातांचे सत्र चालूच आहे. त्यातच बुधवारी समृद्धी महामार्गावर करमाड-शेकटा या गावाजवळ झालेल्या अपघातात चारही भावांचा मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे घडली. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. काकांच्या अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपून येणाऱ्या या भावांवर काळाने घाला घातला आहे. ही घटना बुधवारी पहाटे 3 वाजेच्या सुमारास घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार चालकाला डुलकी लागल्याने गाडीवरील ताबा सुटला. दरम्यान गाडी दुभाजकावर आदळून हा अपघात झाला. चौघे भावंड दोन दिवसांपूर्वी तेलंगणा येथे काकांच्या अंत्यविधीसाठी गेले होते. हा कार्यक्रम आटोपून सुरतकडे जात असतांना ही दुर्दैवी घटना घडली. विशेष म्हणजे या भीषण अपघातात एक मुलगा बचावला आहे.
अपघातात संजय राजणभाई गौड (वय 43), कृष्णा राजणभाई गौड (वय 44), श्रीनिवास रामू गौड (वय 38), सुरेशभाई गौड (वय 41) (सर्व रा. लेफ सिटी करडवा, सुरत, गुजरात) अशी ठार झालेल्या चुलत भावंडांची नावे आहेत.
गौंड कुटुंबीय सुरतचे रहिवासी –
गौंड कुटुंबीय सुरतचे रहिवासी आहेत. सुरतला त्यांचा कपड्याचा व्यवसाय आहे. नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी ते 2 दिवसांपूर्वी तेलंगणाला गेले होते. तेलंगणाहून परतत असताना करमाड-शेकटा या गावाजवळ चालकाला डुलकी लागल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार दुभाजकावर धडकली. या भीषण अपघातात तिघा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाचा रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी करमाड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे.