पुणे – बांधकाम व्यावसायिक सुरेश दुबे यांचा खून प्रकरणी भाई ठाकूर, दीपक ठाकूर, गजानन पाटील यांची टाडानुसार चाललेल्या खटल्यात निर्दोष मुक्तता झाली आहे. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी हा निकाल दिला. टाडा कायद्यानुसार चालले हे देशातील शेवटचे प्रकरण आहे.
दुबे यांचा ९ ऑक्टोबर १९८९ राजी ६ ते आरोपींनी गोळ्या झाडून खून केला होता. १९९२ मध्ये यातील आरोपींना टाडा लावण्यात आला होता. त्यानंतर १७ आरोपींना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात भाई ठाकूर यांच्यासह पाच जणांवर टाडा खटला चालविण्यात आला. खटल्यात १०२ साक्षीदार तपासण्यात आले होते.
१६ मे १९९७ रोजी या गुन्ह्यात १७ आरोपींना पुणे टाडा न्यायालयाने सोडले. त्यामुळे फिर्यादी डॉ. ओमप्रकाश दुबे यांनी अपील केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात नरेंद्र भालचंद्र भोईर, ज्ञानेश्वर पाटील, उल्हास राणे, पॅट्रीक तुस्कानो, राजा जाधव, माणिक अनंत पाटील यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यावेळी या गुन्ह्यात फरार असलेले भाई ठाकूर, दिपक ठाकूर, गजानन अनंत पाटील, संजय चैत्या कडू, पोलिस उपनिरीक्षक आनंदा पाडेकर यांच्या विरुध्द पुणे न्यायालयात आरोपपत्र दाखल झाले होते.
या प्रकरणात विशेष सरकारी वकील सतीश मिश्रा यांनी काम पाहिले. तर बचाव पक्षाच्या वतीने ऍड. सुदीप पासबोला, ऍड. सुधीर शहा, ऍड. रोहन नहार, ऍड. प्रीतेश खराडे, ऍड. सचिन पाटील, ऍड. रोहित तुळपुळे यांनी काम पाहिले.