जालना- शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्याची कॉपी केली आहे. बाजार समितीतही घोटाळा केला. तसेच अजून दोन भूखंडांचे घोटाळे माझ्यासमोर आले आहेत, असा गौप्यस्फोट भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
अर्जुन खोतकर प्रकरणात युती, आघाडी वा सत्तेचा प्रश्न येत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ही चौकशी सुरु झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर हा घोटाळा दाबण्याचा प्रयत्न झाला. पण शिवसेना, भाजप युतीच्या काळात ही चौकशी सुरु झाली होती, असे सोमय्या म्हणाले.
69 कोटीची जमीन खोतकर यांनी 29 कोटीत घेतली. खोतकर यांचे अनेक घोटाळे समोर आले आहेत. महाभारतातील अर्जुन हे वेगळ्या अर्थाने लक्षात होते. तर उद्धव ठाकरेंचे सहकारी हे घोटाळ्यासाठी ओळखले जाऊ लागले आहेत, असा टोलाही सोमय्या यांनी लगावलाय.
उद्धव ठाकरे सरकारवर माझा विश्वास नाही. ईडीवर माझा विश्वास आहे. घोटाळेबाज हा घोटाळेबाज असतो. गुन्हेगारावर कारवाई झाली पाहिजे. जालना बाजार समितीत भाजपचा उपसभापती आहे. ते दोषी असतील तर ठाकरे सरकारने याची चौकशी करावी, असे आव्हान सोमय्या यांनी दिले. राजेश टोपे यांच्यासंदर्भातही आपल्याकडे काही पेपर आहेत. पण अभ्यास पूर्ण होईपर्यंत मी बोलणार नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान खोतकर यांच्यावर नक्की कारवाई होणार, असा दावाही सोमय्या यांनी केला आहे.
भाजपने मला वाऱ्यावर सोडलेले नाही. माझी घोटाळ्यावरची पुस्तिका प्रकाशित झाली ती प्रदेश भाजपने केली आहे. त्याच्या प्रकाशनालाही सगळे नेते उपस्थित होते. त्यामुळे मी आलो म्हणजे भाजप आली, असेही सोमय्या यावेळी म्हणाले.