Arjun Khotkar। लोकसभेच्या निवडणुकीची घोषणा झाली तरीही राज्यातील महायुती आणि मविआतील जागावापाचे पेच काही केल्या सुटेनात. दरम्यान, शिंदे गटाची पहिली यादी प्रसिद्ध होताच त्यांच्यातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर येताना दिसत आहेत. यामध्ये नाशिक, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, धाराशिवसह काही जागांचा तिढा आहे. त्याच या जागावाटपावर शिवसेना शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर यांनी भाजपाला सूचक इशारा दिलाय. ‘भाजपाने शिवसेनेबरोबरची मैत्री जपावी, अन्यथा शिवसैनिकांमध्ये चीड निर्माण होईल’, असे अर्जुन खोतकर यांनी म्हटलंय.
…त्यामुळे तेवढी तरी मैत्री जपली पाहिजे Arjun Khotkar।
“शिवसेनेचे सर्व खासदार विश्वास ठेवून आपल्याबरोबर आले आहेत. त्यामुळे तेवढी तरी मैत्री जपली पाहिजे. मला असे वाटते की, तुम्ही (भाजपाने) त्या जागा सोडून वाद घातला पाहिजे. छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, यवतमाळ, नाशिक या जागा शिवसेनेच्या आहेत. तरीही तुम्ही या जागा मागत असाल तर सहाजिकच शिवसैनिकांच्या मनामध्ये चीड निर्माण होईल. आपल्या हक्काच्या जागा अशा पद्धतीने दबावतंत्राने मागत असतील तर हे फार वाईट असून याचा संदेश चांगला जात नाही”, असे अर्जून खोतकर म्हणाले.
खोतकरांची पक्षाकडे मागणी Arjun Khotkar।
अर्जून खोतकर म्हणाले, “मी देखील पक्षाकडे बोललो होतो की, “भारतीय जनता पक्षाने २० जागा जाहीर केल्या तर आपणही आपल्या १२ किंवा १३ खासदारांच्या जागा जाहीर केल्या पाहिजे होत्या. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शब्द पाळणारे आहेत. त्यामुळे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी जे ठरवून दिले ते केले. पण शिवसेनेच्या ज्या जागा होत्या, त्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करायला हव्या होत्या. आता नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांना चारवेळा शक्तीप्रदर्थन करावे लागत आहे. त्यामुळे लोकांमध्ये दुही निर्माण होण्याची शक्यता असते. त्यानंतर यातूनच पुढे काहीतरी वेगळे घडते”, असे अर्जून खोतकर म्हणाले.