मुंबई – सचिन वाझेचे प्रकरण बाहेर आल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्या अडचणी वाढल्या आहेत. आधी त्यांची तातडीने बदली करण्यात आली आणि नंतर खंडणी, अधिकाऱ्यांना जातिवाचक शिवीगाळ, बुकींकडे पैसे मागितल्याचे आरोप झाल्यानंतर निलंबन करण्यात आले. मात्र हे निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. ठाकरे सरकारे सरकारने केलेल्या निलंबनाच्या कारवाईविरोधात ते कोर्टात जाणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सिंह विरुद्ध राज्य सरकार संघर्ष पहायला मिळत आहे. सचिन वाझे प्रकरणानंतर तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी परमवीर सिंह यांची तात्काळ बदली करत मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नागराळे यांची नियुक्ती केली.
त्यानंतर परमवीर सिंहांनी अनिल देशमुखांनी वाझेला खंडणीचं टार्गेट दिल्याचे आरोप केले आणि अनिल देशमुखांविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्यांना हायकोर्टाचा रस्ता दाखवला. मुंबई हायकोर्टात आल्यानंतर या प्रकरणात सीबीआय चौकशीचे आदेश देण्यात आले.
त्यानंतर अनिल देशमुखांनी राजीनामा दिला आणि देशमुखांच्या अडचणी वाढल्या. मात्र त्यानंतर परमवीर सिंह यांच्यावरही खंडणी मागितल्याचे गंभीर आरोप झाले. आणि परमवीर सिंह यांचं निलंबन करण्यात आलं. आता तेच निलंबन बेकायदेशीर असल्याचा दावा सिंह यांनी केला आहे. त्यामुळे आता कोर्टात धाव घेतल्यावर परमवीर सिंह यांना दिलासा मिळणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.