मुंबई – करोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांना अनेक आघाड्यांवर अडचणींचा सामना करावा लागत आहे. 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे गरीब जनता चिंताग्रस्त आहे. जनतेला दिलासा देण्यासाठी मासिक 400 युनिटपर्यंत वीज वापर करणाऱ्या ग्राहकांचे वीज बिल माफ करावे, अशी मागणी भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे.
करोना विषाणूच्या संकटाच्या काळात सरकारकडून गरीब जनतेला दिलासा देण्याची आवश्यकता आहे.लॉकडाऊनच्या काळात हातावर पोट घेऊन जगणाऱ्या नागरिकांना तसेच मध्यमवर्गीय नागरिकांना अनेक अडचणी सहन कराव्या लागत आहे. या परिस्थितीत 400 युनिटपर्यंत विजेचा वापर करणाऱ्या गरीब व मध्यमवर्गीय ग्राहकांचे वीज बिल माफ केल्यास त्यांना मोठा दिलासा मिळेल. त्यामुळे याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडे केली आहे.