पुसेगाव- “दळण दळते जना जात्यावर ज्वारी, गाईन गुण मी देवा ये तू माझ्या दारी,’ पूर्वी महिला हे गाणं पहाटेच्या वेळी जात्यावर बसून दळण दळताना म्हणायच्या, पण एकविसाव्या शतकात वाटचाल करताना अनेक भारतीय जुन्या रुढी, परंपरा व संस्कृतीचा विसर पडला आहे. याचबरोबर जात्यावरील गाणीही आता पडद्याआड चालली आहेत.
ग्रामीण भागात जात्यावरील गाणी लोकप्रिय होती. पहाटे उठून महिला जात्यावर दळण दळताना गाणी म्हणत असत. त्या काळात वीज नव्हती. साहजिकच पिठाच्या गिरण्याही नव्हत्या. अशावेळी महिला आपल्या घरातील दळण जात्यावर दळत होत्या. जात्यावर दोन किंवा तीन महिला बसून एकावेळी 4 ते 5 पायल्या धान्य सुमारे दोन तासांत दळत असतं. ग्रामीण भागात हे दृश्य असायचे. पहाटेची वेळ.
घराघरांतून निघणारा धूर. मध्येच कोंबडयाचे आरवणे या सर्व गोष्टी म्हणजे ग्रामीण भागातील वगेळे जीवन होते, असे अनेक जण सांगतात. “तो काळ येगळा हुता. आता सगळं बदललं बाबा. त्या वेळची जात्यावरील गाणी सुरात, मधुर आवाजात असायची. आजची कसली आलीत गाणी, नुसता धांगडधिंगा,’ अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ माहिला व्यक्त करतात. त्या म्हणतात की त्या काळातील गोष्ट काही औरच. एक रूपया खिशात असला की समदा बाजार पिशवी भरून यायचा.
आता शंभर रूपयात पिशवीचा कोपरा भरत नाय, हळूहळू काळ बदलला इंजनावरील पिठाच्या गिरण्या सुरू झाल्या. गिरणी सुरू आहे हे ओळखता यावे, म्हणून इंजिनच्या धुराच्या नळकांडीवर डबा बांधत असत. त्याचा पूकपूक आवाज आला की पिठाची गिरण चालू आहे, असे ओळखायची.ंनंतर गावात इलक्ट्रिक पिठाच्या गिरण्या झाल्या आणि जाती बंद पडली. पार कोपऱ्यात जाऊन पडली. जात्यावरील गाणी बंद पडली. आधुनिक युगाकडे झेपावताना भारतीय संस्कृती, कला मागे पडून पाश्चात्य धुंद संगीत सुरू झाले. त्यामुळे ग्रामीण भागातील कला आता संपुष्टात आली आहे, असे एकीने सांगितले.