“जंगल ट्रेक’वर वनविभागाचा वॉच : मुख्य वनसंरक्षकांचा इशारा
पुणे – पावसाळा सुरू झाला की तरुणाईमध्ये दाट जंगलात फिरण्यासाठी जाण्याची “क्रेझ’ निर्माण होत आहे. मात्र, यामुळे वन्यजीवांना उपद्व्याप तर होतोच; शिवाय पावसाळ्यात याठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांनाही जीवाचा धोका निर्माण होतो. या बाबी टाळण्यासाठी तसेच पर्यटकांच्या सुरक्षेसाठी वनविभागाकडून आता अशा “जंगल ट्रेक’वर करडी नजर ठेवली जात आहे. विनापरवानगी राखीव वनक्षेत्रात घुसलेल्या पर्यटकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर यांनी दिला आहे.
मुळशी, भीमाशंकर, भोर यांसारख्या परिसरात घनदाट जंगल असल्याने या ठिकाणी भटकंतीला जाण्याचा मोह अनेकांना होतो. विशेषत: पावसाळ्यात अनेकांना जंगल सफारीचे वेध लागतात. काहीतरी “ऍडव्हेंचर्स’ करण्याची इच्छा आणि सोशल मीडियातील आकर्षक जाहिरातींमुळे जंगल ट्रेकला तरुणाईची पसंती मिळते. मात्र जंगलाची कोणतीही माहिती नसताना, अशी भटकंती जीवावर बेतू शकते. त्यामुळेच राखीव वनक्षेत्रातील सहलींवर नजर ठेवण्यात येत आहे.
याबाबत खांडेकर म्हणाले, “सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आंधरबन, देवकुंड यासारख्या घनदाट जंगलात सहलींबाबत जाहिराती दिल्या जात आहेत.
Stay in reserve forest area, and beware …
मात्र, घनदाट जंगलांमध्ये पावसाळी पर्यटन धोकादायक ठरू शकते. अनेक ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता असते. त्यामुळेच या सहलींसाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे. याशिवाय वन्यप्राण्यांना होणारा उपद्व्याप हे देखील यासाठी एक महत्त्वाचे कारण आहे. जंगलात फिरायला जाणाऱ्यांकडून वन्यप्राण्यांची शिकार करण्याचे प्रकारही घडतात. हे सर्व गैरप्रकार टाळण्यासाठी पूर्वपरवानगी आवश्यक आहे, तसेच विभागाची परवानगी न घेता राखीव जंगलक्षेत्रात प्रवेश केल्याचे आढळल्यास, त्या व्यक्तीवर वनसंरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल.’