योजनेबाबत अद्याप हालचाल नाही : यंदा वृक्षारोपण होणार की नाही याबाबत संभ्रम
पुणे – जलयुक्त शिवार योजनेपाठोपाठ आता वन महोत्सवालाही घरघर लागण्याची शक्यता आहे. अद्याप या योजनेबाबत कोणतीही हालचाल नसल्याने यंदा वन महोत्सव योजनेंतर्गत वृक्षारोपण होईल की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
राज्यातील वृक्षाच्छादन वाढावे, यासाठी राज्याचे माजी वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी वन महोत्सव हा उपक्रम राबविला होता. यंदा या उपक्रमांतर्गत 50 कोटी वृक्षलागवड करण्याचे उद्दिष्ट ठरविले होते. मात्र, महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर एक महिना उलटून गेला तरी अद्याप या उपक्रमाबाबत कोणतीही हालचाल झाली नसल्याने वन विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळेच जलयुक्त शिवारप्रमाणेच वन महोत्सव उपक्रमही “साइडट्रॅक’ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सामाजिक वनीकरण विभाग आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविला जातो. यामध्ये दरवर्षी ठराविक संख्येत वृक्षलागवड केली जाते. यासाठी केंद्र शासन, राज्य शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी तसेच स्वयंसेवीसंस्था आणि नागरिक या सर्वांना उपक्रमात सहभागी करून घेत वृक्षलागवडीचे उद्दीष्ट देण्यात आले होते. उपक्रमाच्या पहिल्या वर्षात 2 कोटी, दुसऱ्या वर्षात 4 कोटी, तिसऱ्या वर्षात 16 कोटी तर, चौथ्या वर्षात 33 कोटी वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते.
या उपक्रमाला सर्वच स्तरातून उत्तम प्रतिसाद मिळत होता. विशेषत: विदर्भात अनेक जिल्ह्यांमध्ये दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा अधिक वृक्ष लागवड झाल्याचे पाहायला मिळाले.
“वनमहोत्सवाबाबत अद्याप तरी कोणती सुचना मिळालेली नाही. मात्र विभागातर्फे नियमितपणे वृक्षारोपण केले जाते. यंदाही अशाप्रकारे वृक्षारोपण केले जाणार आहे.’
– ए. श्रीलक्ष्मी, उपवनसंरक्षक, पुणे वनविभाग
राज्याच्या पर्यावरणीय समतोलासाठी वृक्षारोपण करणे आवश्यक आहे. तसेच, यातून रोजगार निर्मितीलादेखील चालना मिळू शकते. ही बाब लक्षात घेऊन आम्ही हा उपक्रम राबविला. मात्र, नवीन सरकारकडून अद्याप तरी याबाबत कोणतेही प्रयत्न झालेले नाहीत. मी स्वत: वनसचिव विकास खारगे यांच्याशी संपर्क साधून वृक्षारोपण होईल, यासाठी प्रयत्न करण्याबाबत चर्चा केली आहे. मात्र, शासकीयस्तरावर ही मोहीम राबविली नसली तरी वैयक्तिक, सामाजिकरित्या ही मोहीम सुरूच राहणार असून, येत्या काही दिवसांत विविध स्वयंसेवी संस्थांना एकत्र घेऊन, वृक्ष लागवडीची चळवळ सुरूच ठेवणार आहे.
– सुधीर मुनगुंटीवार, माजी वनमंत्री