करोनाचा फटका : फक्त अतिमहत्त्वाच्या दाव्यांची होतेय सुनावणी
– विजयकुमार कुलकर्णी
पुणे – तब्बल 92 वर्षांपासून न्यायदानाचे काम करणारे शिवाजीनगर येथील न्यायालयला करोनाचा फटका बसला आहे. पहिल्यांदाच ते सुनेसुने झाले असून, वकील, पक्षकार यांची गर्दी कमी झाली आहे. केवळ महत्त्वाच्या दाव्याची सुनावणी न्यायालयात होत आहे. इतिहासात पहिल्यांदाच न्यायालयात एवढा सन्नाटा झाला आहे.
5 नोव्हेंबर 1928 रोजी शिवाजीनगर न्यायालयाचे उदघाटन मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सर चार्लस गार्डन यांच्या हस्ते झाले. जोशी-अभ्यंकर हत्याकांड, जनरल अरूणकुमार वैद्य खटला, राठी हत्याकांड, बनावट स्टॅम्प प्रकरणातील अब्दुल करीम तेलगी, पुण्याचे निवृत्त पोलीस आयुक्त रणजीत शर्मा, डॉ. दीपक महाजन खून खटला, संतोष माने प्रकरण, जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा खटला या इमारतीमध्येच चालला. या दुमजली चौकोनी दगडी इमारतीमध्ये मुख्य जिल्हा न्यायाधीश, मोक्का, बाल अत्याचारप्रमाणेच अतिरिक्त सत्र न्यायालये, तसेच जिल्हा सरकारी वकील कार्यालय, वकिलांसाठी भव्य ग्रंथालय, तळमजल्यावर कार्यक्रम, समारंभासाठी अशोका हॉल आहे. गुन्ह्याची संख्या दिवसागणित वाढत आहे.
त्यानुसार न्यायालयाच्या खटल्यांची संख्या वाढून कामकाजाचा ताण वाढत गेला आहे. परिणामी, इमारतीची जागा अपुरी पडू लागली. त्यामुळे 1990 साली जिल्हा प्रशासन आणि त्यावेळच्या पुणे जिल्हा बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्यापुढे म्हणणे मांडले.
तेव्हा पवार यांनी नवीन इमारतीच्या प्रस्तावास तात्काळ मंजुरी दिली. दगडी इमारतीच्या शेजारच्या जागेवर 15 एप्रिल 1990 रोजी उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती चित्ततोष मुखर्जी यांचे हस्ते आणि मुख्यमंत्री शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली इमारतीचे भूमीपूजन झाले. या नवीन इमारतीचे उदघाटन 16 जून 1996 रोजी मुंबई उच्च न्यायालाचे न्यायाधीश एम.बी.शाह, अशोक सी. आगरवाल यांच्या हस्ते झाले.
24 वर्षांपूर्वी बांधलेली ही इमारत आजही नवीन इमारत म्हणून ओळखली जाते. वकिलांचा विचार केल्यास आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचा खटला चालविणारे पुण्यातील पहिले वकील सार्वजनिक काका, त्यानंतर 1920 ते 1980 या काळात वकिली करणारे ऍड. राबबहाद्दूर भोसले, ऍड. गोपाळ मोरेश्वर पटवर्धन, बॅरिस्टर खान, ऍड. सुभद्राबाई तारकुंडे, ऍड. बी.एन.तारकुंडे, ऍड. एन.व्ही. गाडगीळ, ऍड. महाळूणकर, बॅरिस्टर गडकरी, बॅरिस्टर बी.सी. आगरवाल, ऍड. तात्या आडकर, ऍड. बाबा भिडे, ऍड. के.एन.फडके, ऍड. ग.नो.अभ्यंकर, ऍड. का. मा. महाजन, ऍड. जी.जी.कर्णिक, ऍड. गो.भा.पानसे तसेच या न्यायालयात वकिली कात असताना ऍड. तुळपुळे,ऍड. बाळ, ऍड. दिलीप कर्णिक आणि ऍड. बी.जी.कोळसे पाटील यांची उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली होती.
दरम्यान, रोज 5 हजारांवर नागरिकांची ये-जा असलेला हा परिसर सध्या सुनानसुना आहे.
शिवाजीनगर न्यायालय इतिहासात पहिल्यांदाच स्तब्ध झाले आहे. व्हॅकेशन कालावधी असला, तरी न्यायालय सुरूच असते. महत्त्वाच्या दाव्यांची सुनावणी होत असते. आता अवघी काही न्यायालय सुनावणीसाठी उपलब्ध असून, येथे ऑनलाइनही सुनावणी होत आहे. न्यायालयात लोकांना येण्याला बंदी आहे. प्रॅक्टिकली न्यायालयाचे कामकाज थांबलेले आहे. मी 1972 पासून प्रॅक्टिस करत असून, असे न्यायालयाचे कामकाज पाहिलेले कधीच थांबलेले पाहिले नाही. पाकिस्तान, चीन युद्धांसह अनेक कठीण प्रसंग आले. मात्र, न्यायालय कधीच थांबले नाही. मात्र, आता दुर्दैवाने न्यायालयाचे कामकाज थांबले आहे.
– ऍड. एस. के. जैन, ज्येष्ठ विधिज्ज्ञ.