नवी दिल्ली – प्रेमात अपयश आल्याचे म्हणत जर कोणी युवक आत्महत्या करत असेल तर त्या प्रकरणातील महिलेला यात दोषी ठरवता येऊ शकत नाही अशी महत्वपूर्ण टिप्पणी एका खटल्यावरील सुनावणीच्या वेळी दिल्ली उच्च न्यायालयाने केली. एका व्यक्तीच्या चुकीच्या निर्णयाकरता दुसऱ्या कोणाला दोषी ठरवले जाऊ शकत नाही असेही न्या. अमित महाजन यांनी नमूद केले.
यासंदर्भात उदाहरण देताना न्यायालयाने सांगितले की प्रेमात अपयश आल्यामुळे कोणी प्रियकर अथवा परिक्षेत अपयश आल्यावर एखादा विद्यार्थी किंवा खटला हरल्यामुळे एखादा आशील आत्महत्या करत असेल तर त्यासाठी प्रेयसी, शिक्षक आणि वकिल यांना दोष दिला जाऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीच्या दुबळ्या मानसिकतेमुळे त्याने केलेल्या कृतीबद्दल अन्य व्यक्ती जबाबदार ठरू शकत नाही.
काय आहे प्रकरण
न्यायालयात ज्या प्रकरणाची सुनावणी झाली त्यातील मुलगा आणि मुलगी बऱ्याच काळापासून रिलेशनशीपमध्ये होते आणि लग्नही करणार होते. मात्र मुलीने त्याला फसवल्यामुळे त्याने आत्महत्या केल्याची तक्रार त्याच्या पित्याने केली व खटला दाखल केला. या प्रकरणात मुलगा आणि मुलगी यांच्या एका मित्रालाही आरोपी करण्यात आले होते.
सुनावणीच्या वेळी व्हॉटस्अप चॅटचा दाखला देत न्यायालयाने सांगितले की त्यातून एक गोष्ट स्पष्ट होते की आत्महत्या करणारा मुलगा संवेदनशील स्वभावाचा होता. मुलगी जेंव्हा त्याच्याशी बोलण्यास नकार द्यायची त्यावेळी तो आत्महत्या करण्याची धमकी देत असल्याचे दिसून येते. मुलाने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मुलीचे नाव लिहिले आहे ही गोष्ट खरी आहे. मात्र त्याला आत्महत्या करण्यासाठी त्या मुलीनेच प्रवृत्त केले असे चिठ्ठीत कुठेही दिसून येत नाही असे न्यायालयाचे मत असल्याचे नमूद करण्यात आले.