महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघाच्या विविध मागण्या
कोथरुड – कोरोना च्या प्रादुर्भावामुळे कृषी पर्यटन केंद्रे बंद असल्याने शेतकरी अडचणीत आले असून या अडचणीतून त्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघा च्या वतीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व पर्यटन मंत्री यांच्याकडे विविध मागण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रात शेतीपूरक जोडव्यवसाय कृषीपर्यटन व्यवसायाने ग्रामीण भागात रोजगार निर्मिती झाली आहे व शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न निश्चितच वाढले आहे. एक हजारच्या आसपास राज्यात कृषीपर्यटन केंद्रे असुन भारतात राज्य अव्वल स्थानावर आहे. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी ३ मे नंतर लॉक डाऊन संपल्यानंतर कृषीपर्यटन केंद्रे सुरु करण्यास परवानगी मिळावी, कृषीपर्यटन व्यवसायाला हॉटेल ,रेस्टॉरंट, ढाबा याचे निकष लावु नयेत, राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी पर्यटन केंद्रे उभारणीसाठी बँकाकडून कर्जे घेतली आहेत.
संबंधित कर्जाचे एक वर्षाचे व्याज माफ व्हावे व कर्ज हप्ते भरण्यासाठी वर्षभर सवलत मिळावी, राज्यातील कृषीपर्यटन केंद्रास एक वर्षाचा ग्रामपंचायत कर माफ कराण्यात यावा अशा मागण्या महासंघाच्या वतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करत केंद्र चालवले जाईल . प्रशस्त , विस्तीर्ण शेतामध्ये केंद्रे आहेत त्यामुळे सामाजिक अंतर पाळले जाइल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मागील वर्षी प्रचंड पावसामुळे कृषीपर्यटन व्यवसायाला आर्थिक फटका बसला होता तर सद्यस्थितीत मार्चमध्ये परिक्षा संपलेनंतर कृषीपर्यटन व्यवसायाची सुरुवात होणार असतानाच कोरोना चे संकट आल्यामुळे व्यवसाय अद्याप बंद असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे आहे. अशा प्रसंगी राज्य सरकारने शेतकरी हितार्थ निर्णय घ्यावा अशी अपेक्षा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब बराटे यांनी व्यक्त केली आहे.