मुंबई : राज्यातील रास्त भाव दुकानातून पुरविण्यात येणारा धान्याचा इष्टांक हा 2011 च्या लोकसंख्येच्या आधारे केंद्राने ठरवून दिला असून धान्याचा हा इष्टांक वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे, असे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.
नागपूर जिल्ह्यातील रेशन प्रणालीतील दोष दूर करुन पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्याची मागणी सदस्य मोहन मते यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभेत केली, त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, सर्व लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमधून धान्य उपलब्ध करुन दिले जात असून नागपूर शहर आणि ग्रामीण भागात 7 लाख 81 हजार 760 शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातील धान्याचा लाभ मिळतो. त्यातील 3 लाख 80 हजार 347 शिधापत्रिकाधारक हे अप्राधान्य गटातील असल्याने त्यांना कोविड काळात 4 महिने धान्य देण्यात आले, नंतर त्याचे वाटप बंद करण्यात आले. प्राधान्यक्रमाच्या गटातील सर्वांना धान्य देण्यात येत असल्याचेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
जिल्हा स्तरावर दक्षता समित्या स्थापन करण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना सूचित करण्यात येईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.