मुंबई – चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठं यश मिळालं आहे. भाजपच्या निवडणुकांमधील विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्ली येथील पक्ष कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित केले होते. यावेळी त्यांनी केंद्रीय यंत्रणांकडून सुरु असलेल्या कारवायांबाबत देखील वक्तव्य केले होते. मोदी यांनी कोणाचेही नाव न घेता, काही लोक भ्रष्टाचारविरोधातील कारवायांना धार्मिक रंग देत असल्याचा आरोप केला होता. तसेच भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशाराही दिला होता. पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आले आहे.
मोदींचे ते वक्तव्य महाविकास आघाडीला इशारा तर नाही ना? अशीही चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यादरम्यान बैठक सुरु आहे. या बैठकीला काँग्रेसचे नेते देखील उपस्थित राहणार आहेत. या बैठकीमुळे चार राज्यांतील भाजपच्या विजयानंतर व मोदींच्या अप्रत्यक्ष इशाऱ्यानंतर महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर आल्याचं दिसतंय.
महाराष्ट्रात देखील ऑपरेशन लोटस होणार का?
चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांमध्ये यश मिळाल्यानंतर भाजपचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. त्यामुळे मध्यप्रदेश व कर्नाटक प्रमाणे महाराष्ट्रात देखील ऑपरेशन लोटस होणार का? अशी चिंता महाविकास आघाडीतील नेत्यांना असावी असं राजकीय जाणकार सांगतात.
महापालिका व स्थानिक निवडणुकांसाठी रणनीती
विधानसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. राज्यातील महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक जरी पुढे गेल्या असल्या तरी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांना आधीच रणनीती ठरवावी लागणार आहे. आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीच्या नावाखाली एकत्र लढून भाजपचा कसा सामना करायचा याबाबतच्या रणनीतीवर चर्चा होऊ शकते.
केंद्रीय यंत्रणांच्या कारवायांना कसं तोंड देणार?
महाविकास आघाडीतील नेत्यांवर भाजप नेते सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप लावतायेत. महाविकास आघाडीतील नेते केंद्रीय यंत्रणांच्या रडारवर असल्याने यास कसे तोंड द्यायचे याबाबतही तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होऊ शकते.
काय म्हणाले मोदी ?
भ्रष्टाराचाविरोधात कारवाई व्हावी की नाही? पण काहीजण अशा कारवाया रोखण्याचं काम करत आहेत. असे म्हणत त्यांनी शरद पवारांवर नाव न घेता निशाणा साधला. कारण नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर शरद पवारांनी यावर भाष्य केले होते. मलिक मुस्लिम आहेत म्हणून त्यांचा संबंध दाऊशी जोडला जातोय असा आरोप पवारांनी केला होता.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर कोर्टाच्या निर्णयावरही सवाल उपस्थित केले आहेत. त्याचाही मोदींनी गुरूवारी समाचार घेतला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीती नेत्यांविरोधात ज्या कारवाई सुरू आहेत, त्या भाजप केंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून करत आहे, असा आरोप महाविकास आघाडीकडून करण्यात येत आहे.