कराड – करोना महामारीला रोखण्यासाठी लोकांनी घरातच राहून लॉकडाऊनचे नियम पाळावेत. त्यातूनच करोना संसर्गाची साखळी तोडता येणे शक्य आहे. शासन समाजाची काळजी व सुरक्षा घेण्यात सर्व पातळीवर प्रयत्न करत आहे. लोकांनी घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
दरम्यान, लॉकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही ना. पाटील यांनी दिला. ओगलेवाडी ता. कराड येथे करोनाबाधित रूग्ण आढळल्याने ना. पाटील यांनी हजारमाची व परिसरास भेट देऊन पाहणी केली. यावेळी त्यांनी येथील पोलीस, आरोग्य तसेच स्थानिक प्रशासनातील कर्मचारी व कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यावेळी उपाय योजनांचा आढावा घेतला. यावेळी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुका अध्यक्ष प्रशांत यादव, ऍड. चंद्रकांत कदम, ग्रामपंचायत सदस्य सर्जेराव पानवळ, विरवडेचे उपसरंपच अधिक सुर्वे, विश्वास पाटील, चुनीलाल शहा उपस्थित होते.
ओगलेवाडी येथील रेल्वे कर्मचारी कोरोनाबाधित झाल्याने परिसरात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर सर्वांनी सतर्कता बाळगणे आवश्यक असल्याचे सांगून ना. बाळासाहेब पाटील म्हणाले, लोकांनी घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक काम असल्यास घरातून बाहेर जाताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, भाजीपाला, औषधे आणण्यास तसेच बॅंकेत गेल्यास सोशल डिस्टसिंग पाळावे. करोनाशी लढा देताना सर्वांनी सामूहिक जबाबदारीने नियमांचे पालक करणे गरजेचे असल्याचे सांगितले.
सर्वांची सामुदायिक जबाबदारी करोना महामारीने संपूर्ण जगाला आपल्या विळख्यात घेतले आहे. भारतातही करोना विषाणूचा संसर्ग वाढत आहे. यासाठी लॉकडाऊन नियमाचे कडेकोट पालन करणे आणि विषाणूची सायकल ब्रेक करणे, ही सर्वांची जबाबदारी आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा. आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाला सहकार्य करा. सर्वांनी नियमांचे पालन केलेतर आपण करोनाला नक्की हरवू शकतो, असे ना. पाटील यांनी सांगितले.