मुंबई – करोनाच्या संबंधात राहुल गांधी यांनी नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत अत्यंत विधायक भूमिका घेतली. अशा कठीणप्रसंगी विरोधी पक्षांनी कसे वागले पाहिजे याचा वस्तुपाठच त्यांनी घालून दिला आहे अशा शब्दात शिवसेनेच्या मुखपत्रातील अग्रलेखात राहुल गांधी यांचे शिवसेनेने कौतुक केले आहे.
राहुल गांधी यांनी सरकारच्या भूमिकेच्या संबंधात अत्यंत राजकीय प्रगल्भपणाचे दर्शन घडवीत सरकारवर टीका करणे टाळले आहे, त्यांचे मोदींशी राजकीय मतभेद असतीलही पण देशापुढील संकट पहाता ही वेळ राजकीय वादाची नाही, आपण एकत्रितपणे या संकटाचा मुकाबला केला पाहिजे अशी योग्य भूमिका राहुल गांधी यांनी मांडली आहे असे शिवसेनेने म्हटले आहे. आता करोनाच्या आव्हानाच्या संबंधात राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांच्यात समोरासमोर चर्चा होणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांच्या संबंधात काही वेगळी मते असतीलही, पण तशी मते मोदी आणि शहा यांच्याही विरोधात आहेत. पण आज भाजपला जे राजकीय यश मिळाले आहे त्यातील निम्मे यश हे राहुल गांधी यांची प्रतिमाभंजन करून मिळालेले आहे अशी खोचक टिप्पणीही त्यांनी केली आहे. आजही राहुल गांधी यांचे प्रतिमाभंजन करण्याचे काम सुरूच आहे असेही त्यांनी म्हटले आहे. तथापि सध्याच्या करोना संकटाच्या काळात राहुल गांधी यांनी घेतलेल्या भूमिकेचे कौतुकच व्हायला पाहिजे. देश एखाद्या राष्ट्रीय संकटात असेल तर विरोधकांनी कसे वागले पाहिजे याचा वस्तुपाठच त्यांनी यानिमित्ताने घालून दिला आहे.
करोना संकटाविषयी राहुल गांधी यांनी सर्वात आधी देशाला जागे केले होते. त्यांनी सरकारला त्या संबंधी वारंवार त्वरित उपाययोजना करण्याच्या सूचना केल्या होत्या. जेव्हा प्रत्येक सत्ताधारी मध्यप्रदेशातील कॉंग्रेसचे सरकार खाली खेचण्यासाठी प्रयत्नात होता त्यावेळी राहुल गांधी हे सरकारला करोना संकटाविषयी जागे करण्याचे काम करीत होते. करोनाची महामारी पसरण्याचा धोका उद्भवलेला असताना औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या निर्यातीला बंदी घालावी अशी सूचना ते करीत राहिले होते. असे असूनही त्याकडे सरकारने लक्ष दिलेले नसले तरी ही वेळ वाद घालण्याची नाही, आपले मोदींशी मतभेद आहेत पण ते व्यक्त करण्याची ही वेळ नाही असेही राहुल गांधी यांनी त्या पत्रकार परिषदेत नमूद केले आहे.
जर अशा प्रसंगी आपण वाद घालीत बसलो तर आपण करोनाचा मुकाबला यशस्वीपणे करू शकणार नाही अशी भूमिका घेत त्यांनी एक प्रगल्भ भूमिका घेतली आहे असेही शिवसेनेने म्हटले आहे. राहुल गांधी यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केलेले विचार हे एखाद्या चिंतन शिबिरासारखेच होते. त्याचा देशाला लाभच होईल. राहुल गांधी यांचे विचार ऐकल्यानंतर आता पंतप्रधान मोदींनी त्यांच्याशी करोना विषयावर एकदा तरी थेट चर्चा करावी अशी सूचनाही शिवसेनेने केली आहे.