शासन निर्णय झाला, आता प्रतीक्षा छावण्या सुरू होण्याची
पळशी – माण तालुक्यात सध्या दुष्काळामुळे भयानक परिस्थिती निर्माण झाली असून नागरिकांना व पशुधनाला दुष्काळाची झळ बसू नये यासाठी शासनाने टॅंकर व चारा छावण्या सुरु केल्या आहेत. परंतु या दुष्काळी भागातील अनेकांचा मेंढपाळ व शेळीपालन व्यवसाय चारा व पिण्याच्या पाण्यावाचून पूर्णतः अडचणीत आला आहे. शासनाने या भागातील मेंढ्या व शेळ्या जगवण्यासाठी व येथील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय नामशेष होऊ नये यासाठी नुकताच शेळ्या-मेंढ्यांसाठी छावण्या सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. मात्र, तत्काळ या निर्णयाची अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
माण तालुक्यातील पर्जन्यमान कमी असल्याने व याभागातील पाऊस दोनदोन तीनतीन वर्षे गायब होत असल्याने येथील शेती व्यवसाय नेहमीच अडचणींचा असतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांनी यावर मात करण्यासाठी शेतीला जोडधंदा म्हणून पशुधन व शेळ्या-मेंढ्या पाळून आपल्या कुटुबाची गुजराण करत आहेत. शासनाने पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या. सध्या तालुक्यात 60 चारा छावण्यात 35805 मोठी तर 6178 लहान अशी 41 हजार 983 जनावरे आश्रयास आहेत. त्यामुळे पशुधनाचा प्रश्न सुटला असला तरी शेळ्या मेंढ्याची माण तालुक्यातील संख्या मेंढी 95 हजार 705 तर शेळी 79 हजार 796 असे पावणेदोन लाख शेळ्या मेंढ्याची उपासमार गत अनेक महिन्यापासून सुरू आहे.
त्यामुळे या व्यवसायिकांना दिवसभर रानावनात हिंडूनही चारा व पाणी मिळत नसल्याने मेंढरांचे व शेळ्यांचे काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन माणदेश म्हटला की मेंढपाळ हे चित्र पुढील पिढीला पुस्तकात वाचायला मिळू नये यासाठी शेळ्या- मेंढ्याच्या छावण्या तातडीने सुरू कराव्यात व माणदेशाचा मेंढपाळ व्यवसायाला जिवंत ठेवावे अशी मागणी मेंढपाळवर्गातून होत आहे.
सध्या तालुक्यात गत दोन वर्षांत पावसाने पाठ फिरवल्याने सर्वच ठिकाणचे नैसर्गिक जलस्त्रोत गत चार महिन्यापासून आटले आहेत. त्यामुळे पिण्याच्या पाण्याची व जनावरांच्या चाऱ्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप निर्माण झाले आहे. सध्या शेळ्या-मेंढ्या माणच्या मोकळ्या रानावनात अन्न शोधत आहेत तर काही ठिकाणी मेंढपाळ आपली मेंढरं- शेळ्या चारा छावणीच्या परिसरात जनावरांनी खाऊन शिल्लक राहिलेला चारा टाकून दिला आहे ते खात असल्याचे सध्याचे चित्र आहे. यावरून चारा व पाण्याची तालुक्यात किती भीषणता आहे हे दिसून येते तरी नुसता निर्णय झाला तरी त्वरित शासनाने शेळ्या- मेंढ्यासाठी चारा छावणी सुरू करावी अशी मागणी होत आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून मेंढरांचे चारा पाण्यावाचून हाल सुरू आहेत. मोकळ्या रानात मेंढरे फिरवूनही खायला काय नाही तर प्यायलाही कुठं तरी पाणी मिळते.
– धनंजय राजगे , मेंढपाळ