शनिशिंगणापूर – शनीची ईडा पिडा टळू भगवंताची कृपा आमच्यावर राहो ही साद घालण्यासाठी शनि अमावस्याचे औचित्य साधून आज (शनिवार) शनिशिंगणापूर येथे भाविकांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली. सायंकाळपर्यंत तीन लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. पहाटेची मुख्य महाआरती अन्नदाते मेहतानी मुंबई व शिवसेनेचे माजी खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते करण्यात आली. आज सकाळी नऊ वाजून दहा मिनिटांनी अमावस्येला प्रारंभ झाल्याने सकाळच्या प्रहरी अत्यल्प गर्दी जाणवली.
दुपारी गर्दीमध्ये वाढ झाली. दुपारची माध्यान्ह महाआरती झिम्बाब्वे येथील शनिभक्त जयेश यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी चौथरा परिसरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी पहावयास मिळाली. शनिदेवाचा जयघोष व मंगलमय वातावरणामध्ये आरती सोहळा झाला. पोलीस प्रशासनाने दोन किलोमीटर अंतरावर उभारलेल्या वाहन तळावर भाविकांनी वाहने थांबविल्याने तेथून पायी मंदिरापर्यंत जाऊन दर्शन घ्यावे लागले.
मंदिर परिसरात भाविकांच्या गर्दीमुळे दर्शनासाठी रांगा लागल्या, तसेच सशुल्क दर्शनाची व्यवस्था असल्याने हजारो भाविकांनी चौथऱ्यावर जाऊन शनिमूर्तीला अभिषेक करत दर्शन घेतले. मंदिर परिसरातील अभिषेक भवनात अनेक भाविकांनी अभिषेक केला. मंदिर परिसरामध्ये विविध स्टॉल, देणगी कक्ष आदी उभारले होते. आरोग्य पथके तैनात होते. देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, कार्यकारी अधिकारी गोरख दरंदले व उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे आदींसह पोलीस यात्रेवर लक्ष ठेवून होते.
दोन किलोमीटरवर वाहनतळ उभारल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली. यामुळे नाराजी दिसून आली. कडक उन्हाचा फटका भाविकांना बसला. सायंकाळची आरती उद्योगपती सौरभ बोरा, डेंटल कौन्सिल सदस्य राहुल हेगडे यांच्याहस्ते करण्यात आली.
पावसाचा गर्दीवर परिणाम
जून महिना संपत आला, तरी पावसाने पाठ फिरवली. शेतीच्या मशागतीची कामे व पेरण्या थांबल्याने, शिवाय दोन दिवसांपूर्वी शाळा सुरू झाल्या. तसेच आषाढी वारीनिमित्त भक्तगण पंढरपूरकडे रवाना झाल्याने गर्दीत घट झाल्याचे स्पष्ट दिसून आले.
अवैध रिक्षा वाहतुकीला खुलेआम परवानगी
शनिशिंगणापूर यात्रा म्हटली की, येथे पोलिसांची वेगळीच कमाईचे साधन निर्माण होते. भाविकांना पायी जाण्यासाठी गेट टाकले जाते, तर आतमध्ये भाविकांना नेण्या-आणण्यासाठी पोलिसांकडून रिक्षांना पासेस देऊन अवैध प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली जाते. यामुळे पायी भाविकांना मंदिर परिसरात जाण्यासाठी मनःस्ताप सोसावा लागतो. एक किलोमीटर अंतरासाठी वीस रुपयाचे भाडे घेऊन रिक्षावाल्यांनी भाविकांची लूट केली.