आषाढी वारीसाठी आळंदी-पंढरपूर प्रवासासाठी चिकोडी तालुक्यातील अंकली येथून माउलींचे मानाचे दोन अश्व वैशाख शुद्ध दशमीला शितोळे सरकारांच्या राजवाड्यातून प्रस्थान ठेवतात. याबरोबरच मानाची दिंडीही असते. अंकलीतील अंबाबाई मंदिरात पूजन, आरती, जरीपटक्याचे पूजन, जरीपटका अश्व स्वाराच्या स्वाधीन केल्यावर दोन्ही अश्वांसह लवाजमा असलेल्या वाहनाचे पूजन होते आणि हा सोहळा आळंदीकडे मार्गस्थ होतो.
माऊलींच्या पालखी सोहळ्यात दोन अश्वांचा समावेश आहे, याची एक परंपरा आहे. माऊलींच्या रथापुढे जो अश्व चालतो तो माऊलींचा अश्व आणि जरिपटका घेऊन अश्वस्वार असतो तो स्वाराचा अश्व अर्थात दुसरा अश्व. अंकलीकर शितोळे देशमुख यांच्या वाड्यातून पंढरपूरच्या आषाढी वारीला ज्ञानेश्वर माऊलींचा मानाचा अश्व बाहेर पडतो, याला 188 वर्षांची परंपरा आहे आणि अंकलीकर शितोळे देशमुख सरकारांनी ती जपली आहे. दरवर्षी पालखी सोहळ्याच्या 12 दिवस अगोदर मानाचे अश्व अंकली येथून प्रस्थान ठेवून अंकली ते आळंदी हा 315 किलोमीटरचा मार्ग पायी पार करतात. हिरा आणि मोती अशी माऊलींच्या मानाच्या अश्वांची नावे असून त्यांच्यासोबत जरीपटका आणि गादी असते. अश्वांसह त्यांचेही पूजन केले जाते. मानाचा जरीपटका स्वाराकडे सांभाळण्यासाठी असतो.
माऊलींच्या अश्वावर कोणी बसत नाही त्याचे कारण त्या अश्वाच्या पाठीवरील गादीवर माऊलींचे अधिष्ठान आहे, असे मानले जाते. अंकली ते पुणे-आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर हा सुमारे सव्वापाचशे कि.मी.चा प्रवास अश्व चालत करतात. या अश्वांना केलेला नमस्कार माऊलींपर्यंत पोहोचतो आणि माऊलींबरोबर तो विठुरायाला पोहोचतो, अशी वारकरी संप्रदयात भावना आहे. वारी सोहळ्यात रोज पहाटे चार वाजता चोपदार अश्वांना आमंत्रिक करतात. साडेपाच वाजता अश्व दर्शनासाठी माऊलींच्या पादुकांजवळ पुढच्या मुक्कामाकडे मार्गस्थ होतात. सोहळा संपून माऊलींची पालखी आळंदीकडे परतताना दोन्ही अश्व माऊलींना सोडायला पंढरपूरच्या वेशीपर्यंत येतात आणि पुढे अंकलीकडे त्यांचा प्रवास टेम्पोमधून होते.
रिंगण सोहळा
आळंदी ते पंढरपूर असा 250 किलोमीटरचा प्रवास 21 दिवसांचा आहे. या काळातील रिंगण सोहळ्यांना महत्त्वाचे स्थान आहे. पुरंदवडीत पहिले, खुडूस फाटा येथे दुसरे, ठाकूरबुवांची समाधी येथे तिसरे आणि बाजीराव विहीर येथे गोल रिंगण पार पडेल. यानंतर लोणंद, भंडी शेगाव आणि वाखरीत उभे रिंगण पार पडते. रिंगणात अश्व स्वत:हून धावतो-वारीच्या काळात होणाऱ्या गोल आणि उभ्या रिंगणांच्या वेळी सुरूवातीच्या मानकऱ्यांची धाव झाल्यावर प्रथम जरीपटक्याचा अश्व रिंगणात धाव घेतो आणि त्याच्या पाठोपाठ माऊलींचा अश्वही रिंगणात धावतो.
स्वाराचे स्थान
ज्ञानेश्वर माऊलींच्या मानाच्या अश्वांसाठी पारंपरिक पेहरावातील स्वार वारी सोहळ्यात लक्ष वेधून घेतात. जरीपटक्याचा म्हणजेच स्वाराच्या अश्वावर असलेले अंकलीतील तुकाराम कोळी सलग 30 वर्षे पालखी सोहळ्यामध्ये सहभागी असतात. पालखी सोहळ्यातील गोल आणि उभ्या रिंगणाच्या वेळी या स्वाराचे कौशल्य दिसून येते. श्री ज्ञानेश्वर माऊली यांना वारकरी संप्रदायात “राजे’ संबोधले जाते. माऊलींचा पालखी सोहळा लष्करी शिस्तीचा आहे. त्यामुळे पालखी सोहळ्यात अश्वाचे महत्त्वाचे स्थान आहे.