किलोचा भाव सहाशेपार, बाजारातील आवक घटली; पूर अन् पावसाचा फटका
सातारा – पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या पावसाने व त्यानंतर आलेल्या पुरामुळे अनेक जिल्ह्यातील शेळ्या-मेंढ्या पुरात वाहून गेल्या. तर काही ठिकाणी साथीच्या आजाराने अनेक शेळ्या-मेंढ्या दगावल्याने बाजारात शेळ्या-मेंढ्याची आवक घटली. त्यातच कर्नाटक, आंध्र या दोन राज्यातील व्यापाऱ्यांनीही त्यांचा मोर्चा महाराष्ट्रातील शेळ्या-मेंढ्या खरेदी करण्याकडे वळवल्याने सातारा शहर व जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना बाजारातून रिकाम्या हाती परतावे लागत आहे. परिणामी साताऱ्यातील नागरिकांना मटण खरेदी करण्यासाठी प्रतिकिलो सहाशे ते साडेसहाशे रुपये मोजावे लागत आहेत.
पुराचा फटका बसल्याने आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या व्यावसायिकांनी वाहतुकीला सुलभ असल्याने पश्चिम महराष्ट्रातील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केल्याने बकऱ्यांचे भाव वधारले आहेत. बकऱ्यांच्या दरात दुप्पट ते अडीच पटीने वाढ झाल्याने शहरातील मटणाचे दर 600 ते 650 रुपये प्रतिकिलोच्या घरात पोहोचले आहेत. सातारा जिल्ह्यातील हे दर सर्वाधिक असून शहरातील व्यापाऱ्यांना बोकड खरेदीसाठी आता दीडशे ते दोनशे किलोमीटरवर धाव घ्यावी लागत आहे.
शहरातील व्यावसायिक कर्नाटकातील अथणीसह महाराष्ट्रातील जत, माडग्याळ, आटपाडी, सलगर, काष्टी, दौंड, कोरेगाव, कवठेमहांकाळमधून बकऱ्यांची खरेदी करत होते. मात्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये बकऱ्यांची टंचाई निर्माण झाल्याने तेथील व्यावसायिकांनी आपला मोर्चा महाराष्ट्रातील या बाजारपेठांकडे वळविला आहे.
यामुळे बकऱ्यांच्या दरात कमालीची वाढ झाल्याने पशुपालकांमध्ये समाधान असले, तरी शहरातील व्यापाऱ्यांची मात्र चांगलीच गोची झाली आहे. परराज्यातील व्यावसायिकांमुळे बकऱ्यांच्या किमतीत दुप्पट ते अडीच पटींनी वाढ झाल्याने खरेदी, वाहतूक आणि विक्रीचा ताळमेळ घालताना व्यावसायिकांना कसरत करावी लागत आहे. ही बाजू व्यावसायिकांची असली, तरी वाढवलेला दर मात्र अवास्तव असल्याची भावना खवय्यांची बनली आहे.
आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या व्यावसायिकांनी जवळच्या बाजारपेठांतून बकऱ्यांची जादा दराने खरेदी सुरू केल्याने साहजिकच बकऱ्यांची टंचाई निर्माण झाली आहे. यातून दराची स्पर्धा सुरू असली, तरी शहरातील सर्वच दुकानातून चांगल्या दर्जाचे मटण विक्री केले जाते. पैशापेक्षा दर्जा पाहून ग्राहकांकडून मटण खरेदी केले जाते.
शामराव पतंगे , मटण विक्रेता, सातारा.