धनंजय घोडके
वाई – मिनी कोकण समजला जाणारा वाईचा पश्चिम भाग जैवविविधतेने नटलेला अणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. सह्याद्रीच्या डोंगररांगा आणि वनश्रीने बहरलेल्या या भागात पर्यटनवाढीच्या अमर्याद संधी असून दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे धोम धरण परिसर पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेला आहे.
वाईच्या पश्चिम भागात निसर्गाने मुक्त हस्ते उधळण केली आहे. या भागात रायरेश्वर, कमळगड, केंजळगड, सह्याद्रीच्या उतुंग डोंगररांगांमुळे ट्रेकिंग, रॉक क्लायम्बिंग अशा साहसी खेळांना वाव आहे. राज्य शासनाने गडकोटांच्या सुधारणांसाठी पुढाकार घेतला आहे. पश्चिम महाराष्ट्राला वरदान ठरलेली धोम व बलकवडी धरणे याच भागात आहेत. सध्या दिवाळीची सुट्टी असल्याने धोम धरणांवर पर्यटकांची प्रचंड गर्दी होत आहे.
परतीच्या पावसाने धुमाकुळ घातलासुद्धा पर्यटकांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. मात्र, रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे. धोम बोट क्लबवर आधुनिक सोयीसुविधा नसल्याने पर्यटकांची निराशा होत आहे. तेथे पर्यटकांना उभे राहण्यासाठी पुरेशी जागा नसून रस्त्यापर्यंत पाणी भरले आहे. या अडचणी असल्या तरी हा निसर्गरम्य परिसर पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्यामुळेच महाराष्ट्रासह देशाभरातील विविध भाषांमधील चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी या भागाला निर्माते, दिग्दर्शक पसंती देत आहेत. काही गाजलेल्या हिंदी चित्रपटांचे चित्रीकरण पूर्वी याच भागात झाले होते.
मधल्या काळात काही विघ्नसंतोषी लोकांमुळे चित्रपट निर्माते येथे येण्यास धजावत नव्हते. काही भुरट्या संघटनांनी गुंडगिरी व खंडण्या गोळा मागितल्याने हा भाग बदनाम झाला होता; परंतु तेथील परिस्थिती आता बऱ्यापैकी सुधारली आहे.येथील निसगांचा आनंद लुटण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. महाबळेश्वरला येणारे पर्यटक वाईतील महागणपतीसह तालुक्याच्या पश्चिम भागातील धोम धरणाला भेट देत आहेत. शासनाच्यावतीने पर्यटन वाढीसाठी धोम धरणाच्या पाण्यात विमानाचे यशस्वी लॅंडिंग करण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पर्यटन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कानाडोळा केल्याने ही विमानसेवा सुरू होऊ शकली नाही. त्यातच धोम धरणात असलेल्या अनेक बोटी खाजगी व्यावसायिकांच्या असल्याने बोट क्लबवरील सुधारणांना मर्यादा पडतात.
धोम धरण पाहायला येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत असली तरी त्यांना सोयीसुविधा पुरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होताना दिसत नाहीत. पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केल्यास या क्षेत्रात रोजगार निर्मितीसाठी पोषक वातावरण तयार होईल. संपूर्ण वर्षभरात दिवाळी, ख्रिसमस, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व इतर सुट्ट्यांच्या दिवशी येथे पर्यटक येतात. मात्र, त्यांच्यासाठी खाण्यापिण्याच्या व मुक्कामाच्या सुविधा नाहीत.
अशा अनेक उणीवा असल्याने येथे पर्यटक मुक्काम करू शकत नाहीत. खाण्यापिण्याची व्यवस्था नसल्याने पर्यटकांना फार वेळ थांबता येत नाही. पर्यटकांच्या जेवणाची, मुक्कामाची सोय झाल्यास वाईच्या पश्चिम भागातील युवकांना काम मिळेल व ते शहरांकडे धावणार नाहीत. धोम पाटबंधारे विभागाने बोट क्लब सुरू केल्यास पर्यटकांची सोय होण्याबरोबर स्थानिकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. या ठिकाणी मासेमारीसाठी स्थानिकांना ठेके दिल्यास या व्यवसायाचीही भरभराट होईल. प्रशासनाने प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास वाईचा पश्चिम भाग पर्यटकांच्या पसंतीचे स्थळ म्हणून नावारूपास येईल.