संथगतीने नोंदणी : ज्येष्ठ नागरिकांना बसतोय फटका
पिंपरी – राज्य परिवहन महामंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांसाठी स्मार्टकार्डची नोंदणी करण्यात येत आहे. मात्र, ही स्मार्टकार्ड नोंदणी संथगतीने होत असल्याने डिसेंबर अखेरपर्यंत स्मार्टकार्ड नोंदणीचे लक्ष्य पूर्ण होणे कठीण दिसत आहे. राज्यभरातील आगारात ही नोंदणी केली जात असून पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर आगारात आतापर्यंत पाच महिन्यात फक्त 5 हजार 608 ज्येष्ठ नागरिकांनीच स्मार्टकार्ड नोंदणी केली आहे. संथ गतीने होत असलेल्या नोंदणीचा ज्येष्ठ नागरिकांना फटका बसत आहे. तसेच नोंदणी केल्यानंतर स्मार्ट कार्ड मिळण्यासही एक महिन्याहून अधिक कालावधी लागत असल्याने आधी नोंदणीसाठी आणि नंतर कार्ड मिळविण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांना हेलपाटे मारावे लागत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीच्या पास योजनेत पारदर्शकता आणण्यासाठी स्मार्टकार्ड सुरु करण्यात आले आहे. याची सुरुवात 4 जूनपासून वल्लभनगर आगारात करण्यात आली असून आतापर्यंत फक्त 5 हजार 608 इतक्याच स्मार्टकार्डची नोंदणी करण्यात आली आहे. स्मार्टकार्ड नोंदणी ही डिसेंबर पर्यंतच सुरु राहणार असल्याचे एस.टी प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे आहे. मात्र, शहरातील ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षात घेता हे लक्ष्य पूर्ण होणे कठीण दिसत आहे.
स्मार्ट कार्डसाठी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर 15 दिवसांत स्मार्टकार्ड ज्येष्ठ नागरिकांना मिळणे अपेक्षित आहे. मात्र, याला एका महिन्यापेक्षा जास्त वेळ लागत आसल्याने ज्येष्ठ नागरिकांना आगारात व्यर्थच हेलपाटे मारावे लागत आहेत. तर, अपुऱ्या स्मार्टकार्ड नोंदणी व्यवस्थेमुळे ज्येष्ठ नागरिक नोंदणी करण्यासाठी आगारात येत नसल्याचे चित्र आहे. ही अशीच स्थिती राहिल्यास स्मार्टकार्ड नोंदणीचे उद्दिष्ट दिलेल्या कालावधीत पूर्ण होणे अशक्य वाटत आहे.
सुमारे एक टक्काच नोंदणी
पिंपरी-चिंचवड शहराची एकूण लोकसंख्या सुमारे 22 लाखांपर्यंत पोचली असून त्यापैकी 18 टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत. म्हणजे साधारणपणे 4 लाखांपर्यंत ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. सध्या झालेली नोंदणी पाहता केवळ एक टक्का ज्येष्ठ नागरिकांची स्मार्ट कार्ड नोंदणी झाली आहे. उल्लेखनीय बाब अशी की एसटीने प्रवास करणाऱ्यांमध्ये ज्येष्ठ नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. विशेषतः सवलतीच्या दरात प्रवास होत असल्याने खासगी बसच्या तुलनेत ज्येष्ठांना एसटीचा प्रवास खूपच स्वस्तात पडतो. तसेच एसटीचा प्रवास सर्वाधिक सुरक्षित मानला जातो. याशिवाय राज्याच्या काना-कोपऱ्यात केवळ एसटीच पोहचू शकत असल्याने बहुतेक ज्येष्ठ नागरिक एसटीलाच प्राधान्य देतात. परंतु गेल्या पाच महिन्यांमध्ये केवळ एक टक्काच ज्येष्ठ नागरिकांची नोंदणी झाली असल्याने लक्ष्य पूर्ण करणे अवघड दिसत आहे.