कराड – कराड तालुक्यातील महापूर हळूहळू ओसरत चालला असला तरी पुराच्या भीतीने नदीकाठच्या लोकांनी केलेले स्थलांतर जैसे थे अवस्थेतच आहे. तालुक्यातील 31 पूरग्रस्त गावातील पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे.
कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग कमी केल्याने तसेच पावसानेही बऱ्यापैकी उघडीप दिल्याने पाणी कमी होण्यास मदत होत आहे. मात्र, तालुक्यातील कराड शहरासह तांबवे, दुशेरे, आटके, खोडशी, रेठरे खुर्द गावांसह अन्य काही गावांतील 1 हजार 360 कुटुंबांतील पाच हजार 955 लोक अजूनही स्थलांतरितच असून या महापूराचा फटका विशेषत: कृष्णा-कोयना नद्याकाठच्या गावांसह कराड शहराला बसला.
कराड शहरासह तांबवे, दुशेरे, आटके, खोडशी, रेठरे खुर्द, कवठे या गावांसह तालुक्यातील अन्य गावातील शेकडो कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. मात्र गुरुवारी मध्यरात्रीपासून पूर ओसरु लागला आहे. त्यामुळे कराडकरांची व पूरग्रस्त गावांची धास्ती कमी झाली आहे. कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग तुलनेने निम्म्याहून कमी केल्याने आणि पावसाने दिवसभर बऱ्यापैकी उघडीप दिल्याने पाणी कमी झाले आहे.