कृष्णाचे चेअरमन अलर्ट
850 लोकांची निवास व भोजन व्यवस्था; अतुल भोसले युवा प्रतिष्ठानचे सेवाकार्य प्रेरणादायी
वाठार – मुसळधार कोसळणाऱ्या पावसाने कृष्णाकाठी हाहाकार माजवला आहे. कराड तालुक्यात महापूराची परिस्थिती निर्माण झाली असून, कृष्णा नदीच्या काठी असलेल्या खुबी, रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, आटके, कार्वे अशा अनेक गावांना पुराचा मोठा फटका बसला आहे. या गावांमधील बहुतांश भाग पाण्याखाली गेल्याने लोकांना गाव सोडून इतरत्र आसरा घ्यावा लागला आहे. अशा पूरग्रस्त नागरिकांसाठी यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आधारवड बनला आहे.
कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना कार्यस्थळावर सुमारे 850 पूरबाधितांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून पूरग्रस्तांसाठी जेवण तर कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविण्यात येत आहेत.
गेल्या दोन दिवसात पावसाने उघडीप दिली असली, तरी गेले आठवडाभर मात्र मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. विशेषत: 5 व 6 ऑगस्टला झालेल्या धुवॉंधार पावसामुळे रेठरे बुद्रुक, रेठरे खुर्द, खुबी, गोंदी, जुळेवाडी, यासह वाळवा तालुक्यातील शिरटे, नरसिंहपूर आदी गावांमध्ये अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने त्यांच्यावर विस्थापित होण्याची वेळ आली. अशावेळी कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी संबंधित गावांमधील पूरग्रस्त नागरिकांसाठी कृष्णा कारखान्याच्या कार्यस्थळावर पूरग्रस्त आपत्ती निवारण केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार कारखान्याच्या कर्मचारी वर्गाने आणि डॉ. अतुल भोसले युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी पूरबाधित गावांतील लोकांना सुरक्षितपणे कारखाना कार्यस्थळावर आणण्याची कामगिरी बजावली. 850 हून अधिक पूरबाधित नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला, लहान मुलांचा समावेश आहे.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनीही आपत्ती निवारण केंद्राला भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केली. पूरग्रस्तांना लागेल ते सहकार्य करण्याच्या सूचना त्यांनी कारखाना प्रशासनाला दिल्या. कृष्णा कारखाना आणि अतुल भोसले युवा प्रतिष्ठानने घेतलेल्या या पुढाकारामुळे अनेक पूरग्रस्तांना मदत झाली असून, त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.