सातारा – युगपुरुष छत्रपती शिवराय हे जगामध्ये वंदनीय आहेत. त्यांची बदनामी करून समाजामध्ये तेढ वाढवणारे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराजांबद्दव आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या प्रकरणाचा मास्टर माईंड शोधून त्याच्यावर पोलीस कारवाई होणे गरजेचे आहे. यामध्ये सायबर यंत्रणा कुठेतरी कमी पडली आहे. वेळीच या अकाउंटला ब्लॉक केले असते तर ही वेळ आली नसती अशी खंत आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केली.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरुची येथे पत्रकार परिषदेत घेऊन आपली भूमिका मांडली. ते पुढे म्हणाले, पोलीस यंत्रणा कुठे कमी पडली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागितली जाईल. समाज माध्यमातून छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हा मुलगा पोलिसांच्या ताब्यात असतानाही पुन्हा पोस्ट पडल्या. त्यामुळे मुद्दाम शहरातील वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न कोण करतंय का? सायबर विभागाने या पोस्टचा आयपी ऍड्रेस शोधून या प्रकरणाचे सत्य समोर आणावे आणि संबंधित मास्टरमाईंडवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
“पोलिसांना पोलिसांचे काम करू दे. प्रशासन योग्य कारवाई करेल’, अशी सातारकरांना विनंती असल्याचे सांगून ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाबद्दल चुकीचं बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही. या पोस्टबाबत सखोल चौकशी पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाकडून होऊन या प्रकरणाचे सत्य समोर आल्यानंतर सारे वातावरण निवळणार आहे. या प्रकरणामध्ये काही राजकीय कंगोरे आहेत का याचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. सामाजिक सलोखा राखण्यासाठी जिल्ह्यात शांतता कमिटीची बैठक घेण्याची सूचना पोलीस अधीक्षक समीर शेख यांना करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत टोल नाक्यावरील गुंडगिरीचा प्रश्न लावून धरला होता. या संदर्भात त्यांना विचारले असता ते म्हणाले, स्थानिकांना टोलनाक्याच्या संदर्भात सवलत मिळायला पाहिजे. टोलनाका या विषयावर मार्गदर्शक नियमावली शासनाने जाहीर करावी. महाराष्ट्रात काही ठिकाणी जीपीएस प्रणालीचा वापर सुरू झाला आहे. या अत्याधुनिक यंत्रणेचा वापर झाल्यास टोलनाक्याचा प्रश्न मिटणार असल्याचेही ते म्हणाले.