नाणे मावळ – नाणे मावळ, अंदर मावळ व पवन मावळ या तिन्ही मावळातील जोडणारी कामशेत हे ठिकाण कामशेत एसटी थांब्यावर निवारा शेड नसल्याने खरेदी व इतर कारणांसाठी येणाऱ्या नागरिकाना छत्रपती शिवाजी या मुख्य चौकात ताटकळत उभे राहावे लागत आहे. ऊन, वारा, पावसाचा मारा सहन करत, नागरिक, कामगार व विद्यार्थ्यांना कामशेतमधील प्रवास करावा लागत आहे.
कामशेत याठिकाणी तालुक्याची मध्यवर्ती बाजारपेठ असून, मंगळवारी आठवडे बाजार भरत असतो. मावळातील 70 गावांमधील नागरिक खरेदी, विक्रीकरिता येथे मोठ्या संख्येने येत असतात. रोजच या ठिकाणी वर्दळ असली तरी मंगळवारी पवन मावळ, नाणे मावळ,अंदर मावळ या तिन्ही मावळातील लोक बाजारासाठी येत असल्याने अन्य दिवसांच्या तुलनेत हे प्रमाण अधिक असते. तर रेल्वेस्थानक असल्याने नोकरदार, विद्यार्थी व खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांची नेहमीच कायमच वर्दळ असते.
पवन मावळ, नाणे मावळ,अंदर मावळ या तीन मावळातील नागरिकांना कामशेतला येण्या-जाण्यासाठी एसटी बसचा आधार घ्यावा लागतो. शिवाजी चौकात एसटी बसथांबा काही वर्षांपूर्वी अतिक्रमणावरील कारवाईत पाडण्यात आले. ते पुन्हा उभारले नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. नेहमीचे काही प्रवासी एसटी बसकरिता तासन्तास उन्हा- पावसात रस्त्यावर थांबत असून, अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. निवारा शेड नसल्याने या जागेवर खासगी वाहने लावली जातआहेत. त्यामुळे विशेषतः विद्यार्थी, महिला, वृद्धाना चौकाजवळच्या दुकानाच्या आडोशाला उभे राहावे लागते. काही दुकानदार समंजस असल्याने दुकानापुढे उभे राहू देतात. पण काही दुकानदार उभे राहू देत नाही. शिवाय कामशेत या ठिकाणी पार्किंगची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. तर जुन्या पुणे-मुंबई महामार्गालगत असलेला कामशेत पुलाखालील येण्यासाठी असलेला बंद मार्ग सुरू केल्यास वाहनांना पर्यायी मार्ग उपलब्ध होणार आहे.
कामशेत बाजारपेठतील व्यावसायिकांची वाहने त्यांच्या दुकानासमोर उभी करत असल्याने खरेदीकरिता आलेल्या नागरिकांना वाहने रस्त्यालगत लावावी लागतात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. दुकानासमोर तात्पुरती लावलेली वाहने काढण्यासाठी दुकानदार विनाकारण वाद घालतात. शिवाय काही ठिकाणी रस्त्यालगत दुकानदारांनी अतिक्रमण केले आहे. त्याकडे ना प्रशासन ना लोकप्रतिनिधी लक्ष्य देत नाही.
स्वच्छतागृहांचाही अभाव
कामशेत चौकालगत एकही स्वच्छतागृह नसल्याने स्थानिक व्यावसायिक व नागरिकांना गैरसोयीचा सामोरे जावे लागत आहे. विशेषतः महिलांची मोठी कुचंबणा होते. संबंधित प्रशासनाने प्रवाशांसाठी लवकरात लवकर बस स्थानक व निवारा शेड उभारावे. महिला व पुरुषांसाठी शौचालयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी. तसेच महामार्गालगत असलेला कामशेत पुलाखालील येण्यासाठी असलेला बंद मार्ग चालू करावा, अशी मागणी नागरिक उपस्थित करीत आहे.