नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्पातून त्यांनी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. मात्र आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही त्यामुळे नोकरदारांच्या पदरी निराशाच पडली आहे. त्यातच आता या अर्थसंकल्पावर विरोधी पक्ष काँग्रेसकडूनही प्रतिक्रिया समोर आली आहे.
काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोदींनी पगारदार आणि मध्यमवर्गीयांसाठी कोणतीही मदत जाहीर न करून त्यांची निराशा केली आहे.”, असे काँग्रेसने म्हटले आहे. तर, “अर्थमंत्री आणि पंतप्रधानांनी त्यांचा विश्वासघात केला आहे.”, असा आरोपही करण्यात आला आहे.
“मोदी सरकारच्या गलथान कारभाराने देशावरील कर्ज वाढवण्याचेच काम केले आहे, ‘मोदीनोमिक्सने’ अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. मोदी सरकारचा खोडसाळपणा देशासाठी घातक ठरला आहे.” असेही काँग्रेसने म्हटले आहे. याचबरोबर काँग्रेसचे सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांनीही ट्वीट करत या अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारवर निशाणा साधला.
“गरीबांचा, नोकरदार, मध्यमवर्गीय, शेतकऱ्यांचे खिसे रिकामे आहेत, परंतु काहीच नाही. तरुणाचा अपेक्षाभंग झाला आहे. खप वाढवण्यासाठी, लघु उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी काहीही नाही. ” असं सुरजेवाला यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज २०२२-२३ या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला. नोकऱ्या, घरे, शेतकरी, संरक्षण, व्यवसाय आणि क्रिप्टो यासह अनेक क्षेत्रांसाठी त्यांनी मोठ्या घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पाचे पुढील २५ वर्षांसाठी ‘ब्लू प्रिंट’ असे वर्णन केले आहे. २०१९ मध्ये अर्थमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर निर्मला सीतारामन यांनी चौथ्यांदा अर्थसंकल्प सादर केला आहे.