नागठाणे – उरमोडी नदीपात्रातील पाणी उपशावरील निर्बंधात बदल करुन शेतीसाठी ४ तासच शेतीपंप सुरु ठेवण्याचा निर्णय रद्द करून सलग ७ तास थ्री फेज वीज शेतकऱ्यांना देण्याचा निर्णय कृष्णा सिंचन विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांच्या दालनात झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर उरमोडी नदीपात्रातील पाणी उपशावर दि. १ एप्रिलपासून लावलेल्या निर्बंधांच्या अनुषंगाने नदीपात्रावरील उपसासिंचनधारक शेतकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्याबाबत दै. प्रभातने वेळोवेली आवाज उठवला होता. काल दि. १२ रोजी उरमोडीतील पाणीबाणीवर चर्चेतून मार्ग निघाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
टंचाईकाळात बचतीसाठी मंगळवारी पूर्ण दिवस वीज बंद करण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. उरमोडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करायला भाग पाडू नये यासाठी १५ एप्रिलपासून पुढील काळात शेती व पिण्यासाठी पाण्याची ३ आवर्तने देण्याचे नियोजन सिंचन विभागाने केले आहे. वेळप्रसंगी कण्हेर, तारळी धरणातील पाणी योग्य ठिकाणाहून शक्य आहे तिथपर्यंत देण्यात येईल. पिण्याच्या व मुक्या प्राण्यांसाठी पाण्याची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासनही सिंचन विभागाच्यावतीने देण्यात आले.
भरमसाठ पाणीपट्टीवाढ, मीटरसक्ती या मुद्यांच्या अनुषंगानेही चर्चा करण्यात आली. याबाबतीतही शासनस्तरावर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचेही आश्वासन देण्यात आल्याचे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी सांगितले. बैठकीला अर्जुनभाऊ सांळुखे, सुधाकर शितोळे, संजय (बापू) सांळुखे, संग्राम जाधव, विजय घोरपडे, अंकुश घोरपडे, समाधान नलवडे, गौरव सांळुखे यांच्यासह निसराळे, खोडद, अतीत, आंबेवाडी, नागठाणे, बोरगाव, गणेशवाडी, पाडळी, भरतगाव, अपशिंगे मिलिटरी या गावांतील शेतकरी उपस्थित होते. या संघर्षात पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांसह बोरगाव पोलीसांनीही सहकार्य केल्यामुळे शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लागला, असे शेळके यांनी सांगितले.